जागतिक पातळीवर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या इन्फोसिस या आघाडीच्या कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनी भारतीय तरुणांनी किमान 70 तास काम करायला हवे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना नारायण मूर्ती यांचे हे विधान अतिरेकी आणि टोकाचे वाटले आहे. पण त्याचबरोबर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती किंवा इतर अनेक महत्त्वाच्या उद्योजकांनी नारायण मूर्ती यांच्या या विधानाला पाठिंबाही दर्शवला आहे. जगातील विकसित देशांच्या तुलनेने भारतातील उत्पादकता कमी असल्याने ती जर वाढवायची असेल, तर भारतीयांनी आठवड्याला 70 तासांपेक्षा जास्त काम करणे गरजेचे असल्याचे मत नारायण मूर्ती यांनी एका समारंभात बोलताना व्यक्त केले होते. आठवड्यात 70 तास काम करायचे असेल तर सात दिवसांपैकी फक्त एक दिवस सुट्टी घेऊन उरलेले सहा दिवस दररोज 12 तास काम करणे अपेक्षित असते. सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील भारतीयांच्या कामाचा तासांचा विचार करता खासगी क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये शनिवार, रविवारी सुट्टी असते.
म्हणजे त्यांच्यासाठी पाच दिवसांचाच कामाचा आठवडा असतो. या पाच दिवसांमध्ये त्यांचे कामाचे तास फार तर 45 ते 50 तास भरतात. सरकारी क्षेत्राच्या बाबतीत सरकारी कार्यालयांतही महिन्यातून दोन शनिवारी सुट्टी असते. शिवाय चार रविवारही सुट्टी असते. भारतीय कामाच्या आणि संस्कृतीचा विचार करता प्रत्येकाच्याच मनात दररोज आठ तास काम करणे अपेक्षित असते. त्यामुळे जर पाच तासांचा आठवडा असेल तर आठवड्यात फक्त 40 तास काम होते आणि सहा दिवसांचा आठवडा असेल तर हे काम 48 तास होते. नारायण मूर्ती यांच्या अपेक्षेप्रमाणे जर भारतीयांनी 70 तास काम करणे अपेक्षित असेल, तर दररोजच्या कामाचे तास आठ तासांच्या ऐवजी किमान 12 तास करणे गरजेचे राहणार आहे. भारतीयांची उत्पादकता कमी असल्याने ती वाढवण्यासाठी नारायण मूर्ती यांनी हा उपाय सुचवला असला, तरी तज्ज्ञांच्या मते मात्र हा उपाय तितकासा योग्य नाही.
जागतिक पातळीवर झालेल्या एका संशोधनाप्रमाणे आठवड्याला 50 ते 55 तासांपेक्षा जास्त काम झाले की कोणतीही व्यक्ती संपूर्ण क्षमतेने काम करण्याच्या मानसिकतेमध्ये रहात नाही. उलट त्याच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. एका विशिष्ट प्रकारच्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या उत्पादकतेचा विचारही या ठिकाणी करावा लागणार आहे. भारतासारख्या देशांमध्ये आज अनेक उद्योग किंवा व्यवसाय असे आहेत ज्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कामाचे कोणतेही ठराविक असे तास नाहीत. उदाहरणार्थ, पोलीस यंत्रणा असो किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांना दररोज 12 तासांपेक्षा जास्त काम करावेच लागते. अशाच प्रकारची काहीशी अवस्था माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांचीही असते.
नारायण मूर्ती यांना कोणत्या क्षेत्रातील कामगारांनी आठवड्याला किमान 70 तास काम करायला हवे असे अपेक्षित आहे, याचाही विचार या ठिकाणी होण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये जरी आठ तास किंवा दहा तास काम केले तरी नंतर या केलेल्या कामाची जबाबदारी उर्वरित 16 ताससुद्धा संबंधित कामगारांना पेलावी लागते. पोलीस, सुरक्षा यंत्रणा किंवा माध्यम कर्मचारी यांच्यावरची जबाबदारी कधीच संपत नाही. ते सतत 24 तास कामातच असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असो हे नेते दिवसाला 18 तास काम करत असल्याचे दाखले नेहमीच दिले जातात. सुधा मूर्ती यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्वतः नारायण मूर्ती हेसुद्धा त्यांच्या उमेदीच्या काळात आणि आतासुद्धा आठवड्याला 70 ते 80 तास काम करत असतात. या सर्व गोष्टी बरोबर असल्या तरी उत्पादकता वाढवण्यासाठी फक्त कामाचे तास वाढवणेच महत्त्वाचे आहे का, याचाही विचार या निमित्ताने करण्याची गरज आहे.
कारण अनेक वेळा एखाद्या कार्यालयामध्ये जास्त काळ उपस्थित राहणे महत्त्वाचे असते की कमी काळ उपस्थित राहून जास्त काम करणे महत्त्वाचे असते हीसुद्धा चर्चा अनेक वेळा केली जाते. कामाच्या तासांचा पर्याप्त उपयोग करून उत्पादक क्षमता वाढवण्याकडेच जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठीच “वर्किंग कंडिशन्स’ मध्ये बदल करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कामगारांना मिळणारे वेतन, इतर सोयीसुविधा, ते ज्या ठिकाणी काम करतात तेथील सुविधा या सर्वांचा विचार करूनच उत्पादकतेकडे पाहावे लागणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात सेवाक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सेवा क्षेत्रांमध्ये ज्या सेवा येतात त्यामध्ये बॅंकिंग असेल किंवा विमा असेल किंवा आरोग्य सेवा असेल त्या ठिकाणीही अतिरिक्त काम केले जातेच. कोणत्याही अर्थव्यवस्थेतील प्रमुख तीन क्षेत्रे असलेल्या शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेती क्षेत्रामध्ये काम करणारे कोणतीही सुट्टी न घेता आठवड्यातील सातही दिवस काम करत असतात, हे वास्तव आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये 3 शिफ्टमध्ये काम केले जाते.
नारायण मूर्ती यांची इन्फोसिस कंपनी ज्या सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते त्या सेवा क्षेत्रामध्ये मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय कोणालाच नसते, ही गोष्टही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण तरीही नारायण मूर्ती यांनी जो विचार मांडला आहे त्याच्यावर समाजातील सर्वच घटकांनी विचार करून एखाद्या निर्णयाप्रत येण्याची गरज आहे. नारायण मूर्ती एक भांडवलदार आहेत म्हणून ते अशा प्रकारची मते व्यक्त करत आहेत, अशा प्रकारची टोकाची टीका करण्यात काहीच अर्थ नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या दररोज जे कामाचे आठ किंवा नऊ तास ठरवून देण्यात आले आहेत त्या कामाच्या तासांचा सर्वाधिक उपयोग करून उत्पादकता वाढवण्याकडे सर्वांचे लक्ष असायला हवे. खासगी किंवा सरकारी कार्यालयामध्ये नऊ तास उपस्थित असलेला कर्मचारी प्रत्यक्ष किती तास उत्पादक काम करतो हे पाहणेसुद्धा मनोरंजक ठरू शकते. सध्याच्या कामाच्या तासांच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या कामाच्या तासांचा पर्याप्त आणि संपूर्ण क्षमतेने वापर केला तरी सुद्धा भारतीयांची उत्पादकता वाढवण्यास हातभार लागू शकतो.