#CWC2023 #INDvAUS Final : भारतीय संघ सध्या अत्यंत सरस कामगिरी करत आहे. प्रतिस्पर्धा संघांविरुद्धचे सामने जिंकताना प्रत्येकाने आपला वाटा उचलला आहे. त्यामुळेच विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही आमच्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करून आमच्यासह संपूर्ण देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करू, असा निर्धार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले व गुणतालिकेतील अव्वल स्थनासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. या उपांत्य फेरीतही न्यूझीलंडचा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपद आमच्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आत्ता नाही तर कधी असेच म्हणावेसे वाटते. कारण, सध्याच्या संघातील फलंदाज तर अफलातून कामगिरी करत आहेत पण गोलंदाजही आपला सर्वोत्तम स्पेल टाकत आहेत. अंतिम फेरीपर्यंत झालेल्या सर्व लढतीत कोणा एका खेळाडूमुळे संघ विजयी ठरलेला नाही तर सांघिक कामगिरीमुळेच हे सातत्यपूर्ण यश मिळत आहे, असेही रोहितने सांगितले.
सलामीला माझ्यासह शुभमन गिल चांगली फलंदाजी करत आहे. विराट कोहलीबद्दल काय बोलायचे तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांचा विक्रम त्याने मोडला व 50 वे एकदिवसीय शतक साकार केले त्याचा कोहलीइतकाच आनंद मलाही झाला. आता आम्हाला त्याच्यासह श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांच्याकडून अशाच खेळाची आवश्यकता आहे. सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला तर त्यांची क्षमता सहज लक्षात येते. त्यांनीही दिमाखात अंतिम फेरी गाठली. मात्र, तरीही त्यांच्या खेळातील कमकुवत दुवेही समोर आले आहेत. त्यावरच आमच्या योजना तयार करत आहोत. जवळपास एक तप आम्ही आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवू शकलेलो नाही व हीच उणीव यंदा भरून काढायची आहे, असेही रोहित म्हणाला.
फलंदाजीतील ताकद आम्ही पहिल्या सामन्यापासून दाखवून दिली. तसेच गोलंदाजीतील क्षमताही आम्ही सिद्ध केली. जसप्रीत बुमराह, महंमद सिराज यांच्या नावावर जास्त बळी नसतील; परंतु त्यांनी समोरच्या संघातील फलंदाजांवर जे दडपण टाकले ते खूप महत्त्वाचे होते. महंमद शमी तर काय कमाल गोलंदाजी करत आहे. कोहलीप्रमाणे तोदेखील त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धचे त्याचे स्पेल तर खूपच महत्त्वाचे होते. त्यानेही प्रत्येक वेळी संघाला बळी मिळवून देण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस कामगिरी केली आहे. आता रविवारीही त्याच्यासह सर्वच गोलंदाज व फलंदाजांकडून याच सातत्याची अपेक्षा आहे. पुढील केवळ एक सामना याच गांभीर्याने खेळत विजेतेपद मिळवायचे आहे व सर्व खेळाडू त्यासाठी सज्ज बनले आहेत, असेही रोहित म्हणाला.
भारतीय संघ भक्कम – हेझलवूड
भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेतील सर्वात भक्कम संघ आहे. त्यांच्या फलंदाजांना रोखणे खूप कठीण आहे. तसेच त्यांच्या अत्यंत भेदक गोलंदाजीवर वर्चस्व राखणेही जवळपास अशक्य आहे. आम्ही साखळीत त्यांच्याकडून पराभूत झालो तेव्हापासून आम्ही यावर तोडगा कसा काढायचा याचाच विचार करत होतो. मात्र, अद्याप आम्हाला त्याचे उत्तर मिळालेले नाही. गेल्या काही काळापासून भारतीय संघाच्या यशाचा आलेख पाहिला तर तर असेच दिसते की हा संघ त्यांच्या सर्वोत्तम फॉर्मध्ये आहे. मात्र, आम्हीही प्रयत्न सोडणार नाही. त्यांना रोखण्यासाठी आम्ही निश्चितच मार्ग शोधू, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने व्यक्त केले आहे.
झम्पाचे अपयश सतावत आहे
ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतील जितके सामने जिंकला त्यातील उपांत्य लढतीचा अपवाद वगळता त्यांचा लेग स्पीन गोलंदाज ऍडम झम्पा जवळपास प्रत्येक लढतीत यशस्वी ठरला. मात्र, साखळीतील काही सामने ऑस्ट्रेलियाने त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावर जिंकले. आता तो अंतिम लढतीत भारतीय संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो यावरच ऑस्ट्रेलियाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. त्याची कामगिरी खालावल्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे.