लखनौ – उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारचा सलग दुसरा कार्यकाळ सुरू झाला. नव्या राज्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले. त्यामुळे मागील मंत्रिमंडळाचे सदस्य असणाऱ्या सुमारे दोन डझन माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मदतीला मागील वेळी दोन उपमुख्यमंत्री होते. यावेळीही ती व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही केशवप्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपद राखण्यात यश मिळवले आहे.
मागील वेळी मंत्री असणाऱ्या इतर काही प्रमुख नेत्यांनाही यावेळी पुन्हा मंत्री बनण्याची संधी मिळालेली नाही. मागील वेळी मोहसीन रझा हे एकमेव मुस्लिम मंत्री होते. यावेळीही ती संख्या कायम राहिली आहे. मात्र, रझा यांची जागा दानिश आझाद अन्सारी यांनी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांना मंत्री बनवण्यात आले आहे. एक व्यक्ती, एक पद हे धोरण पक्ष अवलंबणार आहे. त्यामुळे भाजपला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.