नगर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला वीकेंडचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज सकाळी पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे चितळे रोड, आडतेबाजार, दाळमंडई परिसरात गर्दी झाली होती.
करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकार्यांनी शहरासह जिल्ह्यात जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यात भाजीपाला, फळे, किराणा, मेडिकल, हॉस्पिटल अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या होत्या.
तर, वीकेंडला शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे दोन दिवस शहरात रस्त्यावर आणि बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र, आज सकाळी सात वाजता वीकेंडचा लॉकडाऊन संपला.
मात्र, येत्या दोन दिवसांत पुन्हा महिन्याभराचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या भीतीने चितळे रोड, दाळमंडई, आडतेबाजार, माळीवाडा आदी परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियमावलीची एैशीतैशी झाली. लोक बिनधास्त रस्त्यावर खरेदी करताना दिसत होते.