नवी दिल्ली – एका पाच वर्षांच्या मुलीचा भूक व आजारपण यांमुळे आग्रा येथे मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत एक नोटीस जारी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या नोटिशीत चार आठवड्यांत प्रशासनाकडून या मुलीच्या कुटुंबाला मदत करा तसेच या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आयोगाने केली आहे.
या मुलीच्या परिवारातील एका सदस्याला टीबी झाला होता, त्यामुळे कमावता हातच जायबंदी झाल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यातच ही केवळ पाच वर्षांची मुलगी भूक सहन करु शकली नाही व त्यातच तीचा मृत्यू झाला.
सरकारने जाहीर केलेल्या योजना केवळ कागदांवरच आहेत का त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही होणार आहे, अशी विचारणाही आयोगाने सरकारला केली आहे.