संगमनेर -दोन दिवसांपूर्वी संगमनेर करोनामुक्त झाल्याच्या या अविर्भावात असलेल्या संगमनेरकरांना नेपाळवरून आलेल्या तबलिगींनी पुन्हा एकदा दणका दिला.चौदा नेपाळी तबलिगींपैकी चार जण गुरुवारी करोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी मनसोक्त फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्यास सुरवात केली आहे. 10 एप्रिलपासून हॉटस्पॉट केंद्र म्हणून तब्बल 14 दिवस सीलबंद परिसरात राहणारे एका परिसरासह आता निम्मे संगमनेर शहर पुढील 15 दिवस हॉटस्पॉटच्या जोखडात अडकणार आहे. पोलिसांनी शहरातील सर्व नाक्यांवर नाकेबंदी केली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गेल्या 1 एप्रिल रोजी रहेमतनगर परिसरात पोलिसांना आढळलेल्या चौदा नेपाळी तबलिगींपैकी चौघांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरातील एका खासगी इमारतीत हे चौदा विदेशी तबलिगी क्वॉरंटाईन होते. असे असतानाही त्यातील चौघांची दुसरी चाचणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्याने संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहवाल प्राप्त झालेल्या चौघातील तिघे पंचवीस वर्षांहून कमी वयाचे आहेत. एकाचवेळी चार रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु वारंवार प्रशासन नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मज्जाव करत असतानाही काही मनमौजी पर्यटनासारखे मुक्त संचार करताना आढळत आहे.
यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, आरोग्य अधिकारी डॉ.संदीप कचोरिया, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या अधिपत्याखाली शहरातील सर्व नाके आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. शहरात येणाऱ्यांची आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहे. समाधानकारण उत्तर मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येत आहे. अन्यथा त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत आहे. शहरातील तीनबत्ती चौक, बसस्थानक, अकोले नाका, नवीन नगर रस्ता आदी ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना विनाबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. महाभयंकर असणाऱ्या करोना विषाणूला रोखण्यासाठी घरातच थांबणे हा सुरक्षित उपाय आहे. परंतु अनेक मनमौजी नागरिकांकडून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासला जात असून सामाजिक अंतरालाही छेद दिला जात आहे. यामुळे करोनाचा विषाणू कधीही आपल्याला कवेत घेईल, याचा नेम देखील लागणार नाही. त्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करुन करोना महामारीपासून आपला बचाव करावा, अशी माफक अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.