भारत हा ऍन्टी मलेरिया मेडिसीन हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) आणि पॅरासिटामॉलचा मोठा उत्पादक देश आहे. करोना व्हायरसविरुद्ध लढाईत जगातील अनेक देशांसाठी भारत एक “देवदूत’ ठरलाय.
अमेरिकेसहीत इतरांसाठी भारत ठरला “देवदूत’
अमेरिकेसारखी महाशक्ती असो, युरोपीय देश असो किंवा सार्कचे इतर सहयोगी देश, मानवता सर्वोच्च स्थानी ठेवत भारताने प्रत्येक देशाला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय.
अमेरिकेने 48 लाख टॅबलेटची मागणी केली होती. परंतु, या देशाला सध्या 35.82 लाख टॅब्लेट दिल्या आहेत. जर्मनीला 50 लाख, बांगलादेशाला 20 लाख, नेपाळला 10 लाख, भूतानला 2 लाख, श्रीलंकेला 10 लाख, अफगाणिस्तानला 5 लाख, तर मालदीवला 2 लाख “हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅब्लेटचा पुरवठा करण्याचा निर्णय भारताने घेतलाय.
औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पाठवणार
भारत अमेरिका, ब्राझील आणि जर्मनीला “ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडेंटस (एपीआय) पाठवणार आहे. याचा उपयोग औषधं बनवण्यासाठी केला जातो. अमेरिकेला आतापर्यंत 9 मेट्रिक टन (एपीआय) पाठवण्यात आलं आहे. जर्मनीला 1.5 मेट्रिक टन (एपीआय), ब्राझीलला 0.50 मेट्रिक टन (एपीआय) पाठवण्यात येत आहे.
संशोधन काय सांगते?
नव्या संशोधनानुसार प्रतिजैविकांसोबत हायड्रॉक्सीक्लोराक्वीनच्या वापराने करोना व्हायरस रुग्ण दहा दिवसांत 91.7 टक्के बरा झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. याशिवाय या उपचारांनी रुग्ण 15 दिवसांत बरे होण्याचा दर 96 टक्के असल्याचेही समोर आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला करोना व्हायरस रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपचारांची चाचणी सुरू करण्यात आल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआयएच) सांगितले होते. या गोळ्यांचा वापर मलेरिया तसेच संधीवाताच्या उपचारांसाठी केला जातो. अमेरिकेतील अनेक रुग्णालयांमध्ये सध्या करोना व्हायरस रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर प्रथम एचसीक्यू वापरून उपचार केले जात आहेत.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चाचण्यांत सहभागी करोनाबाधित रुग्णांना एचसीक्यू 400 एमजी दिवसातून दोन डोस दिले जातात (पहिला दिवस), त्यानंतर 200 एमजी डोस दिवसातून दोनदा दिले जातात (दिवस दुसरा ते पाचवा) किंवा पाच दिवस ठरलेले औषध दिवसातून दोनदा दिले जाते.
संपूर्ण जगाला हवी असलेली गोळी
केंद्र सरकारने पॅरासिटामोल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे या गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांनीही निर्मिती कित्येक पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अनेक कंपन्या या गोळ्यांची निर्मिती करतात. जायडस कॅडिला आणि इप्का लॅबोरेटरिज यामध्ये प्रमुख आहेत. या कंपन्या मासिक निर्मिती 4 टक्क्यांनी वाढवून 40 मेट्रिक टन करण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात हा दर 5 ते 6 टक्क्यांनी वाढणार असून निर्मिती 70 मेट्रिक टन केली जाणार आहे. या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने निर्मिती केल्यास प्रत्येक महिन्याला 200 एमजीच्या 35 कोटी टॅब्लेट तयार केल्या जाऊ शकतात.
भारताची गरज किती?
भारतात एचसीक्यूच्या एका गोळीची किंमत 3 रुपयांपेक्षा कमी आहे. जाणकारांच्या मते, 7 कोटी रुग्णांवर उपचार करण्यासाठी 10 कोटी गोळ्या पुरेशा आहेत. या परिस्थितीत इतर गोळ्यांची निर्यात केली जाऊ शकते. 25 मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार एचसीक्यूला प्रतिबंधित औषधांच्या यादीत ठेवत सर्व प्रकारच्या औषध निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. 1 एप्रिलला झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला.
करोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध शोधण्यात आलेले नाही. उपचारासाठी सध्या अनेक औषधांचा वापर केला जात आहे. पण या सर्वांपेक्षा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध गेम चेंजर ठरत आहे. त्यामुळेच संपूर्ण जगभरातून या औषधाची मागणी वाढली आहे.
फक्त भारतात तयार होते जायड्स केडिला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक महिन्याला 20 कोटी टॅब्लेट इतके उत्पादन घेतले जात आहे. विशेष म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे उत्पादन फक्त भारतात होते. जगातील अन्य कोणत्याही देशात याचे उत्पादन केले जात नाही. भारतात दर वर्षी मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच सध्याच्या घडीला भारत संपूर्ण जगाची या औषधाची गरज पूर्ण करू शकतो.
हे औषध यापूर्वीही भारतीय कंपन्या परदेशात विकत होत्या. मात्र, “एफडीए’चे अनेक अडथळे पार करीत कंपन्या कसे बसे आपला व्यवसाय करीत होती. भारतीय औषध कंपन्यांची क्षमता आज जगाला पुरवठा करण्याचीही आहे. आता मेक इन इंडियाला एक मोठी चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल.
भारतीय वैद्यक संशोधन परिषद कुनैनसारखे रोगप्रतिकारक औषधं तयार करू शकत नाही काय? जे कमी किमतीत सामान्य लोकांना उपलब्ध करून दिले जाईल आणि त्यामुळे मलेरिया आणि करोना विरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवता येईल. पण एक अडचण अशी आहे की हे महाग आहे. म्हणून योग्य वेळेत संशोधन करून कमी किमतीत हे औषध तयार केल्यासच हे औषध फक्त अमेरिकेसाठी नाही तर करोनाच्या लढाईत भारतासाठीही गेमचेंजर ठरेल.
– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)