मुंबई : परतूर (जि. जालना) नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन तसेच काही जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी जालना जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन परतूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो.
अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक सांगितले.