नवी दिल्ली -देशातील 80 टक्के प्रौढ नागरिकांना आतापर्यंत करोनालसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 38 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
देशातील नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या डोसची संख्या 112 कोटींच्या घरात पोहचली आहे. चालू महिन्याच्या (नोव्हेंबर) अखेरपर्यंत 90 टक्के प्रौढांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. त्याशिवाय, 30 नोव्हेंबरपर्यंत दुसरा डोस घेण्यासाठीची मुदत उलटून गेलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
सुमारे 12 कोटी प्रौढ अद्याप दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. सरकारने आतापर्यंत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचे 123 कोटी डोस पुरवले आहेत. त्यातील 18 कोटीहून अधिक डोसचा वापर अजून व्हायचा आहे.
देशातील लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीला झाला. त्या मोहिमेंतर्गत 18 वर्षांवरील प्रौढांचे लसीकरण सुरू आहे. संबंधित वयोगटाखालील बालकांना लस देण्याच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे.