वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ डावाने जिंकला असला तरीही मनात एक प्रश्न उभा राहिला आहे. हा प्रश्न आहे विराट कोहलीच्या मनात काय चाललंय हा. यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना कोहलीने दुय्यम भूमिका घेतली होती. हा प्रश्न नाही तर तो त्याचा नैसर्गिक खेळच करत नव्हता. नवखा फलंदाज जसा गोंधळलेला असतो ना की आक्रमक फलंदाजी करायची का संयमी खेळ करायचा.
कोहलीने पहिला चौकार फटकावण्यासाठी तब्बल 80 चेंडू घेतले. हा आपला कोहली नव्हेच. जयस्वाल एकीकडे घणाघाती फलंदाजी करत असताना कोहलीचे जे काही सुरू होते ते पाहता कोहलीच्या मनात काय सुरू होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे उत्तर मिळू शकले नाही. एकूणच तो या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करतानाही फार मूडमध्ये नव्हता. चाहत्यांच्या मागणीनुसार कोलॅप्सो संगितावर ठुमके घेतले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर ते गांभीर्य का होते, याचा उलगडा झाला नाही.
ज्या वेळी कोहली फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संघाची गरज ओळखून त्याने जयस्वालला साथ दिली. ते आवश्यकच होते. मात्र, साथ देणे म्हणजे केवळ चेंडू टोलवून काढणे नव्हे. संयमी फलंदाजी त्याने यापूर्वीही केली आहे. पण त्याने त्याची बॅट म्यान केलेली कधीही पाहण्यात आली नाही. यावेळीच हे का घडले. त्याला वेस्ट इंडीजच्या अनेक गोलंदाजांनी चक्क हाफव्हॉली गोलंदाजी केल्यावरही त्याने चौकार व षटकार फटकावले नाहीत. तो राहुल द्रविड किंवा चेतेश्वर पुजाराप्रमाणे केवळ चेंडू तटवून काढताना दिसला. या डावात स्क्वेअर कट, पूल ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह हे फटके तो विसरला की काय, अशी शंका यावी इतका तो संथ होता.
मुळातच वेस्ट इंडीजची गोलंदाजी पाहिली तर असे वाटायचे की, यावर भारतीय संघातील पहिले पाचही फलंदाज शतके साकार करतील. जयस्वाल व रोहितने शतके केली. मात्र, कोहली वेळ हातात असूनही करू शकला नाही. तो बाद झाला तेदेखील पचनी पडणारे नव्हते. आजवर रायझिंग चेंडूवर तो कधी अशा पद्धतीने बाद होत नसे. हा त्याच्या तंत्रात आलेला बदल असेल का.
रोहित शर्माच्या कर्णधारपदी असण्याने ड्रेसिंगरुममधे काही बदल झाले आहेत का. मैदानावरही कोहलीशी सातत्याने कोणी चर्चा करताना दिसले नाही. केवळ वेस्ट इंडीजचे फलंदाज बाद होत गेले की सगळे खेळाडू एकत्र यायचे व त्यावेळी कोहली सगळ्यांशीच हस्तांदोलन करताना दिसला. मात्र, हा सोहळा संपला की तो पुन्हा एकदा सीमारेषेवर क्षेत्रक्षणासाठी जात होता.
थर्टी यार्ड सर्कल, स्लीप या जागांवर खरेतर तो उभा असतो. या कसोटीत ते फार वेळा दिसले नाही, याचे काय कारण असावे. संघातील, बीसीसीआय-मधील तसेच अन्य काही होत असलेले बदल त्याला मानवत नाहीत का, असाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.