– अमित डोंगरे
कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगची यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील कामगिरी निश्चितच आश्वासक आहे. त्याच्या फलंदाजीची शैली, वाढलेला आत्मविश्वास व समोर कोणताही गोलंदाज असला तरीही नैसर्गिक खेळ करण्याची त्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. येत्या काळात भारताच्या टी-20 संघासाठी तो निश्चितच चांगला पर्याय ठरु शकतो.
कारकिर्दीच्या सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळत नव्हती, त्यामुळे त्याने कंटाळून अमिरातीत एका लीगमध्ये भाग घेतला. त्यावेळी बीसीसीआयने त्याच्यावर बंदीही लावली होती. त्याने वस्तूस्थिती कथन केल्यावर ही बंदी मागे घेतली गेली व त्याला प्रथम दर्जाच्या तसेच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळाली. तो आत्यापर्यंत कोणाच्याही ध्यानीमनी नव्हता.
मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या षटकांत 28 धावांची गरज असताना अखेरच्या पाच चेंडूवर जसे सलग पाच षटकार फटकावले व कोलकाता संघाला एक अविश्वसनिय विजय मिळवून दिला त्यावरून दर्जा तर आहे हे सहज दिसून येते. त्यानंतरही त्याची बॅट अनेक सामन्यात तळपली. अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याच्याकडूनही प्रत्येक सामन्यात अर्धशतक किंवा शतकाची अपेक्षा करणे चूक आहे परंतु एक असा फलंदाज कोलकाता संघाकडे आहे की जो येत्या काळात देशाचे प्रतिनिधित्वही करु शकतो.
त्याच्याकडे क्रिकेटबुकचे सर्व फटके आहेतच परंतु इम्प्रोव्हाईज शॉट्सही खूप आहेत. त्याला एबी डीवीलियर्स किंवा सूर्यकुमार यादवप्रमाणे लगेचच मिस्टर 360 म्हणायला नको कारण बिरुदे खेळाडूंमध्ये धमेंड निर्माण करतात. रिंकूला आपला साधाच राहु द्या. प्रत्येक वेळी महान खेळाडूच नव्हे तर, लो प्रोफाईल खेळाडूच इतिहास घडवतात. आता लगेच रिंकूकडून इतिहासाची अपेक्षा नाही मात्र, त्याची यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील संपूर्ण वाटचाल पाहिल्यावर त्याला भारताच्या टी-20 संघात खेळवून पाहायला काय हरकत आहे. एखाद्याला त्याच्या गुणवत्तेला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी तर मिळायलाच हवी.