-अमित डोंगरे
लॉर्डस कसोटीत भारत व इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये जे काही घडले ते सभ्य गृहस्थांच्या खेळाला बदनाम करणारे तर होतेच; पण त्यातून एक गोष्ट समोर आली की मैदानावरील दोन्ही पंच, तिसरे पंच तसेच सामनाधिकारी यांचेही सामन्यात काय घडते त्यावर नियंत्रण नसते. खरेतर अशी स्लेजिंग वा कोणतीही घटना घडत असताना मैदानावरील पंचांनी केवळ बघ्याची भूमीका घ्यायची नसते. तर त्यात हस्तक्षेप करत दोन्ही संघांतील खेळाडूंना आचारसंहितेची आठवण करुन द्यायची असते.
क्रिकेटच्या नियमानूसार अशी कोणतीही घटना घडली की त्यासाठी अत्यंत कठोर नियम आहेत पण त्याची अंमलबजावणी करताना खेळाडू कोण आहे, त्याचा दर्जा काय किंवा एकूणच त्याची प्रतिमा काय याचा विचार न करता खेळ मोठा असतो हे लक्षात घेत कारवाई केली पाहीजे.
लार्जर दॅन लाईफ इमेज माध्यमांनी किंवा चाहत्यांनी केलेली असते त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. समोरचा खेळाडू कोणीही असे त्याने जर नियमावलीचा भंग केला असेल तर त्यात जी कठोरातील कठोर कारवाई करण्याचे नमूद केले असेल ती केली जावी. उलट स्टारडम असलेल्या खेळाडूवर तर जीतकी शक्य असेल ती कारवाई केली गेली पाहिजे. गुन्हा कोणी केला ते महत्वाचे नाही तर गुन्हा काय घडला आहे त्याला महत्त्व दिले पाहिजे. लॉर्डस कसोटीतच नव्हे तर त्यापूर्वी झालेल्या नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीतही दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शब्दाक चकमकी घडल्या आहेत.
जर ही केवळ थट्टामस्करी असेल तर पंच त्याकडे दुर्लक्ष करतात पण इथे चक्क एकमेकांच्या आई-वडिलांची आठवणही काढली गेली तरी पंच बघ्याची भूमिका घेताना दिसले. हे जास्त गंभीर आहे कारण जर गोऱ्या लोकांनी स्लेजिंग केली तर कान व डोळे बंद करायचे व याउलट झाले तर आरोळी मारायला मोकळे. काही वर्षांपूर्वी हेच होत हेते.
संघ इंग्लंडचा असो, ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या गैरवर्तनाकडे साफ दुर्लक्ष केले जात होते व एखाद्या आशियाई व आफ्रिकी देशांच्या खेळाडूंकडून असे स्लेजिंग घडले तर लगेच हा सभ्य गृहस्थांचा खेळ धोक्यात येत होता. आज त्यावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही यातूनच असे दिसते की, इंग्लंडचे खेळाडू पामरासारखे वागत होते व भारतीय क्रिकेटपटूच हंटर घेऊन उभे हाते. मैदानावरील पंचत किंवा तिसरे पंच यांना जमत नसल्याचे दिसले तर सामनाधिकाऱ्यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत अशा बट्टा लागणाऱ्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
एखादा फलंदाज किंवा गोलंदाज शिरजोर होऊ लागला की त्याला डीवचले जाते हे मान्य आहे पण त्याला काही मर्यादा व संकेत पाळायचे असतात. भारतीय क्रिकेटपटूही काही धुतल्या तांदळासारखे आहेत, असे आमचे म्हणणे नाही पण त्यांनी आजवर कधी संस्कृती सोडलेली दिसली नाही. उलट परदेशी संघांनी सातत्याने या खेळाला काणिमा फासला आहे.
पूर्वी बेन स्टोक्सने मुंबईत अंगातील जर्सी काढून जे वर्तन केले त्यावर कोणी काही बोलले नाही; पण सौरव गांगुलीने लॉर्डसच्या बाल्कनीत जर्सी काढली तेव्हा सगळ्यांनीच टीकेचा सूर लावला होता. हा विनू मांकड, विजय हजारे, अजित वाडेकर, सुनील गावसकर किंवा महंमद अझरूद्दीनचा संयमी भारतीय संघ नाही तर हा नव्या युगाचा आक्रमक विराट कोहलीचा भारतीय संघ आहे. आज या संघाची खोड काढण्याची कोणाचीही हिंमत नाही कारण जशास तसे उत्तर देणारा आणि जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा संघ आहे.