नवी दिल्ली – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या यशापयशानंतरच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका सदस्याने दिली आहे. या स्पर्धेनंतर शास्त्री यांचा करार संपत असून तो वाढवण्यास शास्त्री फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, जर या स्पर्धेत भारतीय संघाने सरस कामगिरी करताना विजेतेपद पटकावले तर शास्त्रींचा कार्यकाळ वाढूही शकतो, असे संकेतही या सदस्याने दिले आहेत.
शास्त्री यांचा कार्यकाळ अमिराती व ओमान येथे होणाऱ्या टी-20 विश्वरंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. शास्त्री आपला करार आणखी वाढवण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत असे म्हटले जात आहे. बीसीसीआयने देखील मुख्य प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा विचार व्यक्त केला होता.
मुख्य प्रशिक्षकासंदर्भात चर्चा सुरू असताना खुद्द शास्त्री यांनी यावर अद्याप मत व्यक्त केलेले नाही. मात्र, या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार शास्त्री यांना आणखी एक मुदतवाढ मिळू शकते. भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतरच होणार आहे. त्यामुळे जर संघाची कामगिरी सरस झाली व शास्त्री यांनाही या पदावर आणखी काही काळ राहण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे त्यांना मुदतवाढ दिली जाईल, असेही या सदस्याने सांगितले.
श्रीलंकेतील यशस्वी दौऱ्यानंतर राहुल द्रविड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात येणऩार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, त्यांनी मुदत संपल्यानंतरही पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदासाठी फेरअर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या नावावरील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
तसेच सध्याच्या सपोर्टस्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याही नावाची चर्चा सुरु असल्याचे बोलले जात असले तरीही त्याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदासाठी सध्या तरी कोणाच्याही नावाचा विचार केला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.