– अमित डोंगरे
आयपीएल सुरू होऊन आता चौदा वर्षे होत आहेत. तरीही आयसीसीला समज आलेली नाही. केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील सर्व देशांच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलचे वेळापत्रक वगळून आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करावा, असा सल्ला आयसीसीला दिला आहे. मात्र, हटवादीपणा आयसीसीने सोडलेला नसला तरीही तो केवळ बैलाला पाहून पोट फुगवलेल्या बेडकासारखा आहे. येत्या काळात आयसीसीने हे समजून घेतले नाही तर आयपीएल आयसीसीलाच भारी पडेल.
आयसीसीने सुरू करण्यापूर्वी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने दोन-तीन तासांत संपणाऱ्या फुटबॉल सामन्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी व क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी हे टी-20 क्रिकेट सुरू केले. सुरुवातीला बीसीसीआयने त्याला कडाडून विरोध केला. नंतर जगमोहन दालमिया व ललित मोदीने यातील आर्थिक फायदा ओळखला व बीसीसीआयचा विरोध मावळला. त्यानंतर 2007 साली झालेली पहिली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारताने जिंकली अन् त्याचवेळी आयपीएलचा जन्म झाला.
आता या स्पर्धेने इतके बाळसे धरले आहे की अन्य आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यापेक्षा अनेक खेळाडू केवळ आयपीएल टू आयपीएल यावरच आपली गुजराण करत आहेत. आता एक खरे की यातून भारतासह अनेक देशांना नवी गुणवत्ता मिळाली. पण त्यामुळे आयसीसीसमोर त्यांच्या स्पर्धा जिवंत ठेवण्याचेच आव्हान निर्माण झाले आहे.
आता यंदाच्याच आयपीएलचे उदाहरण घ्या. एकीकडे आयपीएल सुरू आहे, तर दुसरीकडे वेस्ट इंडिज-श्रीलंका, पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका या मालिकाही खेळल्या जात आहेत. आता न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील मालिकाही सुरू होत आहे. या सगळ्या संघांना आयपीएलमुळे फटका बसला आहे. पण तरीही ते आणि आयसीसीने आपला हट्ट सोडलेला नाही.
येत्या वर्षाअखेर भारतात आयसीसी टी-20 विश्वकरंडक होत आहे. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय मालिकाही होणार आहेत. मात्र, आयपीएलमुळे बीसीसीसआय वगळता सगळ्याच प्रमुख संघांना त्याचा फटका बसत आहे. विविध देशांच्या संघातील स्टार खेळाडू त्यांच्या मालिका खेळण्याचा विचार सोडून आयपीएल खेळायला प्राधान्य देत आहेत. आता तरी आयसीसीने आयपीएलसाठी विंडो ठेवावी, नाहीतर त्यांनाच दारात बसण्याची वेळ येईल.