मुंबई -राजस्थान रॉयल्सला चमकदार कामगिरी करायची असेल, तर कर्णधार संजू सॅमसनची बॅट तळपणे आवश्यक आहे. संजू सॅमसन एका सामन्यात धावा करतो, दुसऱ्यामध्ये फ्लॉप ठरतो. त्याचे हे असेच सुरू असते. संजू हा राजस्थानचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने धावा करणे हे संघासाठी आवश्यक आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर आता संजूवर आणखी जबाबदारी आली आहे. कर्णधारपदाचे उदाहरण सिद्ध करण्याची संधी त्याच्याकडे आहे, असे मत सुनील गावसकरांनी व्यक्त केले.
संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध 119 धावा ठोकल्या होत्या. मात्र, त्यानंतर संजूची बॅट तळपलीच नाही. पुढच्या तिन्ही सामन्यांत संजू 4, 1 आणि 21 धावा करून माघारी परतला. त्याच्या खेळीमध्ये सातत्य नसल्याने सुनील गावसकर यांनी त्यावर टिप्पणी केली आहे.
कर्णधाराला सुरुवातीपासून संघाचा मोर्चा सांभाळावा लागतो. संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळला. मात्र, त्यानंतर सातत्याच नाही. हीच त्याची समस्या आहे. त्यामुळेच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकत नाही, अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी सुनावले. राजस्थानकडे डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिससारखे खेळाडू आहेत. जे आक्रमक फलंदाजी करू शकतात.
पण संजूला पहिल्या फळीत धावा करून चांगली सुरुवात करावी लागेल. कारण त्यांच्याकडे चांगला फिनिशर नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यामुळे गुणतालिकेत राजस्थान सर्वात शेवटी आहे.