– अमित डोंगरे
डोके ठिकाणावर आहे का ? हा प्रश्न आता इंग्लंडला नव्हे तर भारताचा कर्णधार विराट कोहलीलाच विचारायला हवा. कारण ओव्हलवर जो संघ भारताने या कसोटी सामन्यासाठी उतरवला तो पाहून हाच प्रश्न मनात उभा राहतो. कोहलीने केलेली संघ निवड खरोखर झेपली नाही.
सकाळी खेळपट्टी पाहिल्यावर कोहलीने विचारही केला नसेल की, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल. हेडिंग्लेवर भारतीय संघाचे पहिल्या डावात बारा वाजलेले पाहिल्यावर जगातील कोणताही कर्णधार गवत राखलेल्या खेळपट्टीवर आणि इंग्लिश वातावरणात समोरच्या संघालाच फलंदाजीला बोलावेल. खुद्द कोहलीनेही नाणेफेक जिंकली असती तरीही हेच केले असते. आपल्या संघ निवडीबाबत बोलायचे तर संघात महंमद शमीसारखा एकच असा गोलंदाज होता की, जो सामन्याच्या कोणत्याही क्षणी बळी मिळवून देईल आणि कोहलीने नेमके त्यालाच संघाबाहेर ठेवले.
ओव्हलची खेळपट्टी पाहिल्यावर ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅकग्राला वगळले असते का? दुसरीकडे इशांत शर्माला वगळण्यात येणार याचे संकेत आधीच मिळाले होते, पण त्याचा पर्याच शार्दुल ठाकूर कसा काय होऊ शकतो. कोहलीने नक्की अभ्यास केला आहे, का आपले निवड करायची व ही मालिका एकदाची संपवावी हेच मनात आल्यामुळे घोषित केलेला संघ खेळवला हेच आता कळेनासे झाले आहे.
ठाकूर चांगला गोलंदाज आहे यात वाद नाही, पण मुंबईच्या वानखेडेवर खेळणे आणि ओव्हलवर खेळणे यात राहुल द्रविड ते चेतेश्वर पुजारा इतका मोठा फरक आहे हे कोहली जाऊ द्या रवी शास्त्री यांनाही कळू नये याचे आश्चर्य वाटते.
दुसरे आश्चर्य म्हणजे सामन्याचा सराव नसलेल्या उमेश यादवला संघात स्थान देताना नक्की काय विचार केला होता. शमीच्या जागी उमेशला खेळवणे याच्यावर काय बोलणार. कोणताही सारासार विचार या संघनिवडीसाठी झालेला नाही हे उघडपणे दिसत आहे. उमेशकडे शमीपेक्षा जास्त वेग नाही, स्लोअरवन नाही, नक्कल बॉल नाही, गुडलेंथवरून उसळी घेणारा बाउंसरही नाही मग केवळ अवेस्विंगर किंवा इनस्विंगरवर संपूर्ण इंग्लंड संघावर कसे दडपण राखणार.
भारताच्या संघात बेंचवर रवीचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, अक्सर पडेल, मयंक आग्रवाल, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा, अभिमन्यू इश्वरन असे खेळाडू असताना ठाकूर व उमेशची निवड निश्चितच खटकते. त्यातही या मैदानावर अश्विनने गेल्या मालिकेत हॅट्ट्रिक घेतली होती त्यालाही निवडले नाही.
प्रसिद्ध कृष्णाचा कसोटी संघात राखीव म्हणून समावेश केला असे वृत्त आले होते. जर कोणाला खेळवायचे आहे ते निश्चित होते तर उगीच कृष्णाच्या निवडीला फार्स कशासाठी. आणखीन एख प्रश्न निर्माण होतो की हंडिंग्ले कसोटीत दुखापत झालेला रवींद्र जडेजा या सामन्यापूर्वी पूर्ण फिट कसा ठरला. अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळण्याची शक्यताही नाही मग निदान कोहलीसह संघ व्यवस्थापनाचे डोके ठिकाणावर आहे का या प्रश्नाचे तरी उत्तर मिळावे.