टोकियो – टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या सुयश जाधवला पदक मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आज (शुक्रवारी) त्याला 50 मीटर बटरफ्लायमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.
महाराष्ट्राचा सुयश जाधव 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये अपात्र ठरला होता. शर्यत सुरू झाल्यावर अर्धे अंतर (50 मीटर) पार केल्यावर मागे परतत असताना एकदाच बटरफ्लाय किक मारायची असते, असा नियम आहे. सुयशकडून दोनवेळा किक मारली गेली होती त्यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आले होते.
यंदाच्या स्पर्धेत सुयशला अद्याप यश मिळालेले नसले तरीही त्याला आता पदक मिळवण्याची अखेरची संधी मिळाली आहे. 100 मीटरच्या स्पर्धेपूर्वी तो 200 मीटर वैयक्तिक मिडलेमध्येही सहभागी होणार होता. मात्र, अजारी पडल्यामुळे त्याने या गटातून माघार घेतली होती. स्पर्धेदरम्यान त्याला सर्दी झाल्यामुळे तसेच घसा खवखवत असल्यामुळे करोना चाचणीही करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आला असून त्यात निगेटिव्ह ठरल्यामुळे त्याला 50 मीटर बटरफ्लायमध्ये सहभागी होता येणार आहे.
त्यापूर्वी, गुरुवारी सकाळच्या सत्रात भारताचा बॅडमिंटनपटू सुहास यथिराज याने पुरुष एकेरी श्रेणी एसएल-4 गटाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्याने जर्मनीच्या निकलास पॅट याला 21-9, 21-3 असे अवघ्या 19 मिनिटांत पराभूत केले. सुहासने ब्राझील ओपन आणि पेरू ओपन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना टोकियो पॅरालिम्पिकची पात्रता मिळवली. पुरुष एकेरीत सुहासनंतर भारताच्या तरुण ढिल्लननेही सलामीचा सामना जिंकला.