ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारताचा दौरा केव्हाही करो त्यांची मीडिया स्ट्रॅटेजी करण्याची खोड काही जात नाही. आताही तेच घडले आहे. पहिली कसोटी गमावल्यावर आपल्या फलंदाजांच्या सदोष तंत्राच्या मर्यादा उघड्या पडल्याचे मान्य करण्याऐवजी त्यांनी खेळपट्टी व ती तयार करणाऱ्या क्युरेटरवर खापर फोडले. ही असली पोरकट कारणे देऊ नका आपले तंत्र आधी सुधारा असेच आता त्यांना सांगावेसे वाटते.
ज्या फिरकी गोलंदाजीसमोर त्यांची वाताहत झाली ती श्रेष्ठच आहे; पण अनप्लेएबल निश्चितच नाही. या गोलंदाजीवर सध्या खेळत असलेल्या इंग्लंडच्या ज्यो रुटसारख्या कित्येक फलंदाजांनी धावा केल्या असत्या. ऑस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्र असलेले स्टिव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा व मार्नस लेबुशेन आहेत की मग ते का अपयशी ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी या मालिकेपूर्वी सराव सामने खेळण्यास दिलेला नकार हेच आहे.
भारतात यापूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने दौरा केला आहे त्या प्रत्येक वेळी त्यांनी सराव सामने खेळले आहेत व त्याचा त्यांना लाभही झालेला आहे. अर्थात, त्यांना भारतात भारतीय संघाला पराभूत करत मालिका जिंकण्यात 2004 साली यश आलेच होते की, मग याचवेळी हा अकांडतांडव कशासाठी. आपल्या तंत्रात चुका आहेत, त्रुटी आहेत व त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी वाट्टेल ती कारणे द्यायला सुरुवात केली आहे. हे आजारी मानसिकतेचेच लक्षण आहे यात शंका नाही.
त्यांचे स्टिव्ह वॉ, मॅथ्यू हेडन, रिकी पॉंटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, जस्टीन लॅंगर, मार्क टेलर असे कितीतरी फलंदाज भारतात खेळले आहेत व मोठ्या खेळीही केल्या आहेत. आता फिरकी गोलंदाजी खेळण्याचा त्यांना सरावच नसल्याने त्यातही ऑफ स्पिन गोलंदाजी भूतापेक्षाही त्यांच्यासाठी भीतिदायक ठरते हा इतिहास पाहिला तर त्यांना यश येत नाही हे लक्षात येते. अर्थात, ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आपल्या खेळातील चुका दुरुस्त करू शकत नाही याचेच आश्चर्य वाटते.
एकेकाळी जागतिक क्रिकेटची महासत्ता असलेल्या या संघातील स्टार फलंदाज धावांसाठी झगडताना दिसतात हीच शोकांतिका आहे. त्यामुळे आपले तंत्र सुधारा विनाकारण मीडिया स्ट्रॅटेजी करत कारणे सांगू नका, असेच आता म्हणावेसे वाटते.
अमित डोंगरे