नवी दिल्ली – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशातील अनेक मोठ्या राज्यांमध्ये आता करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी केंद्रानेदेशभरातील राज्यांतील करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देखील दिला आहे.
अश्यातच, केरळमध्ये करोना केसेस वाढत चालल्याने राज्य सरकारकडून गर्भवती महिला तसेच व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जाॅर्ज यांनी याबाबत घोषणा केली आहे. वृद्ध आणि अंथरुणाला खिळलेल्या रूग्णांचे या आजारापासून संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोविड-19 मुळे 85 टक्के मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंत्र्यांनी ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले असून लवकरच खासगी रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात येईल असे सुद्धा सांगितले आहे.