नगर – गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात विशेषतः नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. मात्र आता पोलीस प्रशासनच सातत्याने टीकेचे धनी होऊ लागल्याने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोक्का, तडीपारसह अन्य कारवाई सुरू केली आहे.
त्यानुसार कारवाईचे तब्बल 161 प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. मात्र हे प्रस्ताव काही महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. त्यामुळे गुन्हेगार आपले कोणीच वाकडे करू शकत नाही याच तोऱ्यात आहेत.
मागील काही महिन्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांकडून खून झाल्याचा घटना नगर शहरात घडल्या. मारणारे व यात मरण पावलेल्या व्यक्ती अशा दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजही डझनभर गुन्हे असूनही अनेक गुन्हेगार सर्रास समाजात वावरताना आढळत आहेत.
अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचे प्रस्ताव केले आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची स्वतंत्र टू प्लस यादी करण्यात आली आहे. यात चालू वर्षात 259 गुन्हेगारांची भर पडली. तसेच पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत चार टोळ्यांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यापैकी दोन टोळ्यांवर कारवाई झाली, तर दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत. 10 टोळ्यांवर हद्दपरीचे प्रस्ताव झाले होते, त्यापैकी 9 टोळ्या हद्दपार करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे नगर शहर व जिल्ह्यातील 151 गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवाईसाठी व 10 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून प्रस्तावांवर अद्यापही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करून पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी म्हणून समन्वय असून या गुन्हेगारीला पायबंद बसण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. त्यानुसा त्यांनी पोलीस प्रशासनाकडून तडीपारीबाबत आलेले प्रस्ताव तातडीने निकाली काढून संबंधितांवर कारवाई करण्याचे जाहिर केले होते. प्रत्यक्षात मात्र आता या कारवाईचे प्रस्ताव अजूनही पडून आहेत. त्यामुळे या कारवाईंना महसूल विभागाकडून खोडा घातला जात असल्याचे दिसत आहे.