पुणे – समुपदेशनामुळे वाद-विवाद मिटतात. गैरसमज दुर होतात. माणसाचे जीवन समृध्द बनते. माणूस माणसाला जोडला जातो, असे मत पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि समुपदेशक ऍड. अतुल गुंजाळ यांनी व्यकत केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे समुपदेशन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, ऍड. प्रसाद मराठे, ऍड. मनोज बिडकर, ऍड. जयश्री वाकचौरे, ऍड. सुजाता तांबे, ऍड. पांडुरंग थोरवे, पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, ऍड. सचिन हिंगणेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात “मध्यस्थी प्रक्रीया’ या विषयावर ऍड. गुंजाळ बोलत होते. समुपदेशनामुळे वेळ, पैसा वाचतो, असेही ऍड. गुंजाळ यांनी सांगितले. न्यायाधीश देशमुख म्हणाले, माणसाच्या मेंदुची मशागत करण्याची कला म्हणजे समुपदेशन.
वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी व कौटुंबिक वाद टाळण्यासाठी दोघांनी एकमेकांना समजुन घेतले पाहिजे. एकामेकांच्या चुका माफ केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांनी आपापसातील वाद मिटविण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे मध्यस्थीसाठी संपर्क साधावा. वाद मिटवावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप सावंत यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. सचिन हिंगणेकर यांनी केले. तर आभार ऍड. पांडुरंग थोरवे यांनी मानले.