मुंबई – अभिनेता शाहरूखानचा मुलागा आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मॉडेल मुनमून धमेचा यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिलेला तपशीलवार आदेश समोर आला आहे. त्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (एनसीबी) आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपात क्वचितच एखादा सकारात्मक पुरावा असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
या तिघांना नितीन सांबरे यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. या सर्वांना दोन ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याचा 14 पानी अहवाल शनिवारी तपशीलवार उपलब्ध झाला.
आर्यन खानकडून कोणतेही अमली पदार्थ जप्त करण्यात आले नव्हते. मर्चंट आणि धनेचा यांच्याकडून अत्यंत कमी प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडून व्यावसायिक प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत, त्यांच्याशी सांगड घालून अमली पदार्थ नियंत्रण विभाग तो साठा एकत्रित असल्याचे दाखवत आहे.
गुन्हा करण्याचा कट या तिघांनी रचल्याचा कोणताही पुरावा नाही किंवा या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींसोबत या तिघांची आधी एकत्र बैठक झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
बेकायदा कृत्य करण्यासाठी हे सारे एकत्र जमले असल्याचा क्वचित एखादा पुरावा या न्यायालयसमोर आला आहे. आजच्या तारखेपर्यंत झालेल्या तपासात आरोपी क्र. एक आणि दोन (आर्यन खान आणि मर्चंट) हे आरोपी क्र. तीन (धमेचा) पासून स्वतंत्रपणे प्रवास करत होते. त्यांच्यात या मुद्द्यावर कोणतीही बैठक झाली नव्हती, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अमली पदार्थांच्या व्यावसायिक वापरात या आरोपींचा सहभाग होता, असे तपासाच्या या टप्प्यावर तरी म्हणता येत नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.
तपासाच्या या टप्प्यावर जामीन हवा असताना ठोस पुराव्याची गरज नसते, या एनसीबीने केलेल्या युक्तीवादावर उच्च न्यायालय म्हणाले की, हा गुन्हेगारी कटाचा खटला असल्याने ते शाबित करण्यासाठी प्राथमिक गोष्टी दिसल्या तरी त्याकडे संवेदनशीलपणे पाहता येते. त्यामुळे त्याची गरज आहे.
त्या बोटीतून आरोपींनी प्रवास केला म्हणजे त्यांच्यावर कलम 29 (कट) लावण्याचा पाया तयार आहे, असे मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कथितरित्या आर्यन खानच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या संभाषणाच्या एनसीबीने केलेल्या दाव्यावर न्यायालय म्हणाले, त्यात कट सिध्द करण्यासारखे काहीही आक्षेपार्ह नाही. अन्य आरोपींशी मिळून आरोपी एक आणि दोन आणि सर्व तिघांनी मिळून गुन्हा करण्यासाठी कट रचल्याच्या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या आरोपींनी ड्रग्जचे सेवन केल्याचे मान्य केले असल्याचा एनसीबीने केलेल्या दाव्यावर न्यायलयाने म्हटले की, त्या तिघांनी सेवन केल्याचे मान्य केले हा दावा त्यांचा कटात सहभाग असल्याचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. जरी या आरोपांचा विचार केला तरी त्यास जास्तीत जास्त एक वर्ष कारावासाची शिक्षा आहे. आरोपींनी या आधीच कोठडीत 25 दिवस काढले आहेत. आरोपींनी अमली पदार्थ सेवन केले आहेत की नाही याची अद्याप वैद्यकीय तपासणी देखील झालेली नाही..
आरोपींनी दिलेला कबुली जबाब हा तपास सुरू करण्यासाठी कारण म्हणुन वापरता येईल. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा केला आहे, हे दाखवण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही असे न्यायालयाने तुफानसिंह विरूध्द तामिळनाडू सरकार या खटल्याचा संदर्भ देऊन स्पष्ट केले.