Nagpur Flood : नागपूरमध्ये 23 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूरमधील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आढावा घेतला. तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागपूरमध्ये पूर परिस्थितीवरून देखील पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नागपूरमधील पूर परिस्थितीवरुन भाजपवर टीका केली होती. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर पूर परिस्थितीवरुन आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “नागपुरात विकासाच्या नावाखाली जी सिमेंटची जंगलं वाढली आहे त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली असून, याला काही नेते जबाबदार आहेत.” यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. “110 मिलिमीटर पाऊस दोन तासात पडल्यानंतर जगातील कुठल्याही शहरात ही परिस्थिती निर्माण होते. नागपुरात तर फार चांगली व्यवस्था आहे. नागपूर शहर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामुळे बदलले आहे.”
पुढे ते म्हणाले, “ज्यांचे या शहरासाठी शून्य योगदान आहे आणि त्यात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांचा समावेश आहे. तर आदित्य ठाकरे यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी एक रुपयाही नागपूर शहरावर खर्च केला नाही. ज्यांनी नागपूरच्या विकासासाठी एक रुपया खर्च केला नाही त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही नागपूर बघायला समर्थ आहोत. ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये.”
दरम्यान, नागपुरात शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य झाल्याने सर्वत्र पाणी झाले होते. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. तर घराघरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांची देखील धावपळ झाली होती. अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होऊन हे पाणी नाग नदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले होते.