नवी दिल्ली – जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेशी लस उपलब्ध होणार असल्याचे आज केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. दिवासभरात 1 कोटी नागरिकांचे लसीकरण शक्य होईल, इतक्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, असे सरकारने म्हटले आहे.
करोनाविरोधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दोन लसींचे एकत्रीकरण करणे हे कोविड-19 विरोधी प्रोटोकॉलला अनुसरून नाही, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या दोन डोसमधील वेळापत्रकातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्बंध उठवण्याबाबतच्या निकषांबाबतही केंद्राने स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबतचा निर्णय घेताना जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटीचे प्रमाण आठवड्याभरासाठी 5 टक्क्यांपेक्षा कमी असले पाहिजे, असुरक्षित लोकसंख्येतील 70 टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे आणि कोविड-19 विरोधी वर्तनाचे सामूहिक पालन व्हायला हवे, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
देशभरातील 344 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे 30 राज्यांनी म्हटले आहे. देशात सर्वाधिक बाधितांचे प्रमाण 7 रोजी नोंदवले गेले होते. त्यामध्ये सुमारे 69 टक्क्यांनी घट झली असल्याचेही केंद्राने म्हटले आहे.
लसींचे एकत्रीकरण नको…
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे एकत्रीकरण करणे अद्याप प्रोटोकॉलला अनुसरून नाही. एकाच लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या जायला हव्यात. परिणामकारकता वाढवण्याच्या हेतूने दोन लसींचे एकत्रीकरण करणे, ही चांगली कल्पना वाटू शकते. मात्र त्याचे विपरीत परिणाम नाकारले जाऊ शकत नाहीत. निराकरण न झालेली ही एक वैज्ञानिक समस्या आहे आणि त्याचे निराकरण विज्ञानाच्या आधारेच केले जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.