गावागावांतील यात्रा कमिटींच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष
जेजुरीगडावरील सोमवती अमावस्या यात्रा रद्द
पुणे – जिल्ह्यातील गावागावांतील ग्रामदैवतांच्या यात्रा फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घेतल्या जातात. मात्र, यावेळी “करोना’ या संसर्गजन्य आजाराचे सावट असल्याने विविध ठिकाणच्या ग्रामप्रशासनाने यात्रा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्येची यात्राही रद्द करण्यात आली असल्याचे संस्थानकडून सांगितले आहे.
जेजुरी, दि. 13 (वार्ताहर) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची दि. 23 मार्चला होणारी खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे.आज झालेल्या ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये पसरत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी (दि. 23) सोमवती अमावस्या आली आहे. मात्र, सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावस्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही. याशिवाय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळनेही करोनामुळे ही यात्रा रद्द करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नाही. पालखी सोहळ्याबाबत विचारविनिमय करण्याबाबत पेशवे वाडा येथे बैठक पार पडली.
यावेळी खंडोबा देवाचे मुख्य मानकरी राजाभाऊ पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, रमेश राऊत, छबन कुदळे,जालिंदर खोमणे, अमोल शिंदे, दत्ता सकट, किसन कुदळे, अरुण अण्णा खोमणे, राजाभाऊ खाडे, माणिक पवार, खंडेराव काकडे, माधव बारभाई, काळूराम थोरात आदी उपस्थित होते.