मुंबई – करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात आजपर्यतची सर्वाधिक 1233 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तब्बल 769 रुग्ण मुंबईतील असून झोपडपट्ट्यातील रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. तर आज 34 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूंपैकी मुंबईतील 26, पुणे, अकोला येथील प्रत्येकी 3, तर जळगाव आणि सोलापूर येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करूनही लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर बंद होत नसल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील करोनाबधित रुग्णांच्या संख्येत रोज शंभरपेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडते आहे. गेल्या 24 तासात 1233 करोनाचे रुग्ण मिळाले असून यातील 769 मुंबईचे आहेत. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजारच्या पुढे गेली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16758 झाली आहे.
राज्यात 16 हजारांचा टप्पा पार
करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात आजपर्यतची सर्वाधिक 1233 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तब्बल 769 रुग्ण मुंबईतील असून राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 16 हजार 758वर पोहचल्याने चिंता वाढली आहे. तर आज 34 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 651 झाली आहे.
राज्यभरात आज मृत्यू झालेल्यांपैकी 21 पुरुष, तर 13 महिला आहेत. यामध्ये 60 वर्षे किंवा त्यावरील 18 रुग्ण आहेत. तसेच 13 रुग्ण हे वयवर्षे 40 ते 59, तर 3 जण 40 वर्षांखालील आहेत. या 34 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति गंभीर आजार होते. राज्यात झालेल्या एकूण मृतांचा आकडा 651वर पोहोचला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 90 हजार 879 नमुन्यांपैकी 1 लाख 73 हजार 838 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर 16 हजार 758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1 हजार 48 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 11 हजार 692 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 51.14 लाख जणांचे सर्वेक्षण केलेले आहे.