नवी दिल्ली: लॉकडाऊन संपल्यावर आपल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी 93 टक्के कर्मचारी उत्सुक आहेत. त्यातील 85 टक्के जणांना त्यापूर्वी कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करावे असे वाटत आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
माइंडमॅप ऍडव्हान्स रिसर्च या संस्थेने 560 भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये हे सर्वेक्षण केले. त्यात 84 टक्के पुरुष तर 16 टक्के महिला होत्या. यातून हाती आलेल्या माहितीनुसार, 59 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची भीती भेडसावत आहे. तर 25 टक्के जणांना आर्थिक समस्या भेडसावतील, असे वाटते. तर 16 टक्के लोकांना हा पेचप्रसंग दीर्घकाळ चालेल असे वाटते.
कामावर असताना आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरक्षेचे नियम मालकांवर बंधनकारक करावेत अशी अपेक्षा 85 टक्क्यांनी व्यक्त केली. कॉर्पोरेट हेल्थ रिस्पॉन्सबिलीटी कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्हायला आवडेल असे मत 99 टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.तपासणीला सामोरे जाण्याची तयारी 82 टक्के कर्मचाऱ्यांनी दाखवली. तर 18 टक्के कर्मचाऱ्यांनी, अशी तापसणी बंधनकारक असावी, असे मत व्यक्त केले. 73 टक्के सहभागी कर्मचाऱ्यांनी घरातून काम करू देण्याची अपेक्षा व्यक्त केली.