मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरामध्ये आज जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता आपल्या राहत्या घराच्या आवारातून घंटा नाद करत कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील घंटा नादमध्ये सहभाग नोंदवला. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आठवले यांनी आपल्या घराच्या गच्चीमध्ये येत थाळी वाजवत कृतज्ञता व्यक्त केली.
आठवले यांनी याबाबत आपल्या ट्विटर खात्यावरून संदेश देत कोरोनाविषयक जनजागृती आपल्यामुळेच होत असल्याचा दावा केलाय. हा दावा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये मांडला असून ते लिहतात, “पंतप्रधानांच्या आवाहनानुसर जनसंचारबंदी यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार! कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सर्व डॉक्टर सुरक्षा आणि आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभारासाठी केलेला थाळीनाद हा कोरोना विरुद्ध जनजागृती चा शंखनाद आहे. कोरोना गो चा मी दिला नारा; जागा झाला समाज सारा!”
काही दिवसांपूर्वी आठवले यांचा, ‘कोरोना गो.. गो कोरोना’ अशा घोषणा देतानाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचाच संदर्भ आठवले यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिला असून त्यांनी आपल्यामुळेच समाजामध्ये कोरोनाविषयक जनजागृती झाली असल्याचा दावा केलाय.