नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसात देशभर वेगवेगळ्या ठिकाणी ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ३९२ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १० हजार १९७ आहे तर उपचारानंतर १ हजार ३४३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मंगळवारी संध्याकाळपासून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील १८, उत्तर प्रदेशचे ६, गुजरातचे ४, मध्य प्रदेशचे ३, दिल्लीचे २, कर्नाटकचे २ तर तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब आणि मेघालयातील प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
देशभरातमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. देशात आतापर्यंत एकूण ३९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक १७८ मृत रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ५३, दिल्लीमध्ये ३०, गुजरातमध्ये ३०, तेलंगणामध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.