न्यूयॉर्क : जगभरात हाहाकार माजवलेल्या या कोरोनामुळे लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला पुन्हा एकदा आपल्या अहवालात बदल करावा लागला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोरोनामुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा अंदाज पुन्हा एकदा वर्तवला आहे. या संघटनेनुसार एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यातच सुमारे ३०.५ कोटी लोकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जाणार आहेत. यापूर्वी या संघटनेने प्रत्येक आठवड्यातील ४८ तासांची पूर्णकालिक नोकरी असलेल्या १९.५ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले आहे.
संघटनेने आपल्या अहवालात कोरोनामुळे अनौपचारिक क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांसमोर संकट उभा राहिले आहे. कारण या महामारीमुळे कमावण्याचे साधन बंद झालेले आहे. भारताबाबत सांगायचे म्हटले तर कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर वाढून २३.४ वर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयईच्या) अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे भारताच्या शहरी बेरोजगारीचा दर ३०.९ टक्के पर्यंत वाढू शकतो. तर एकूण बेरोजगारी २३.४ टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या अहवालावरुन स्पष्ट होते की, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट होणार आहे.
सीएमआयईईचा अंदाज आहे की, बेरोजगारी दर मार्च महिन्याच्या मध्यास ८.१ टक्क्यांवरुन २३ टक्के झाला आहे. सीएमआयईईच्या आकडेवारीनुसार शहरी क्षेत्रात बेरोजगारीचा दर १५ मार्च २०२० ला ८.२१ टक्के होता. तर २२ मार्च २०२० ला तो ८.६६ टक्केवर आला. त्यानंतर २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केल्यावंतर यामध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. २९ मार्च २०२० ला हा ३०.०१ टक्क्यांवर पोहोचला. ५ एप्रिल २०२० च्या आकडेवारीनुसार हा ३०.९३ टक्क्यांवर आला. लॉकडाऊनच्या केवळ दोन आठवड्यातच सुमारे ५ कोटी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. तर काहींना तात्पुरते घरी पाठवण्यात आले आहे, असे भारताचे माजी मुख्य सांख्यिकी प्रोनब सेन यांनी म्हटले.