नवी दिल्ली – देशातील करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पुन्हा एकदा सामान्य होताना दिसतंय. अनेक राज्यांनी विषाणूचा संसर्ग थोपवण्यासाठी घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र रुग्णांची संख्या कमी होत असली तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज रुग्णसंख्या कमी होण्याच्या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
रुग्णसंख्या कमी होण्याचा दरात घट झाल्याने चिंता
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज देशातील करोना परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी, “देशातील करोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. मात्र जर आपण रुग्णसंख्या कमी होण्याचा आताच दर व आधीच दर पाहिला तर ही निश्चितीच चिंतेची बाब आहे. आम्ही याबाबत राज्य सरकारांशी बोलत आहोत.” अशी माहिती दिली.
करोना इतक्यात जाणार नाही
दरम्यान, जगभरामध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची वाढू लागल्याचे देखील अगरवाल यांनी सांगितले. “आपण जर जगभरातील करोना परिस्थिती लक्षात घेतली तर या महासाथीचा अंत इतक्यात होणार नाही असं दिसत. जगभरातील करोना रुग्णांच्या संख्येत दखलपात्र वाढ होताना दिसतीये. हे चिंतेचे कारण आहे. आपल्याला विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहेत.” असं अगरवाल यांनी सांगितलं.
२२ जिल्ह्यांतील करोना परिस्थितीमुळे चिंता
देशातील २२ राज्यांमधील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यातील ७ जिल्हे केरळ, ५ मणिपूर व ३ मेघालय येथील आहेत. येथे गेल्या ४ आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसतंय. हे चिंतेचे कारण आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशामध्ये करोनाचे २९६८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नवे रुग्ण वाढण्याची आठवड्याची सरासरी ३८९० इतकी आहे. देशामध्ये दुसऱ्या लाटेत करोना विषाणूचा संसर्ग शिखरावर असताना ६ मे रोजी ४,१४,१८८ नवे रुग्ण आढळून आले होते. २४ तासांत सापडणाऱ्या रुग्णांचा हा सर्वोच्च आकडा होता. ७ जून पासून देशात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या आत आली आहे.