नवी दिल्ली – जगभरात पुन्हा एकदा करोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिले पाहिजे. करोना संबंधीत आरोग्य व्यवस्थापनेची सर्व तयारी केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज दिले आहेत. या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून काम करण्याची सूचनाही त्यांनी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी करोनासंबंधीत सद्यस्थिती काय, तसेच राज्यांची त्यासंदर्भात तयारी काय आहे याचा आढावा घेतला.
मनसुख मांडविय म्हणाले, जगभरात करोनाच्या वाढत्या धोक्याचा पार्श्वभूमीवर भारतामध्ये सतर्कतेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाच्या चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांचा फॉलोअप घ्यावा, त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी सर्व राज्यांना दिले. राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावे आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे, असेही त्यांनी सांगितले.