पुणे – ‘जेथे रक्ताचे नाते गोठले तेथे माणूसकी उभी राहिली’ याचा यथार्थ अनुभव लॉकडाऊन काळात पदोपदी अनुभवायला आला. करोनाची भीतीच इतकी होती, की आपल्या जीवाभावाच्या मृत व्यक्तीचे पार्थिव तसेच स्मशानभूमीच्या दारात, रुग्णालयात सोडून अनेक नातेवाईक निघून गेले. त्यावेळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचे व्यवस्थापन ज्या ठेकेदारांकडे आहे, त्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. तर काही स्वयंसेवी संस्थांसाठी काम करणाऱ्या लोकांनी, या पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले.
एक 68 वर्षीय वृद्ध महिलेचा करोनाने मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या मुलांना कॉल करून ही माहिती दिली. तसेच रुग्णालयातील अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोलावले. तसेच पार्थिव ताब्यात घ्या, असेही सांगितले. मात्र, त्यांनी रुग्णालयात परस्पर ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पैसे भरले. तुम्ही प्रक्रिया करा असे सांगणारा “पॉवर ऑफ ऍटर्नी’ असलेला मेल रुग्णालय प्रशासनाला पाठवला.
ऍम्ब्युलन्सवाल्याला गुगल पेद्वारे पैसे दिले आणि स्मशानभूमीत पार्थिव नेऊन अंत्यसंस्कार करा असे परस्पर सांगितले. अशावेळी रुग्णालयातील कर्मचारी, ऍम्ब्युलन्स चालक आणि स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धेवर अंत्यसंस्कार केले.
दुसऱ्या एका घटनेत एका समाजाच्या एका व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते. परंतु संबंधितांना त्यांच्या समाजाच्या पद्धतीने मृतदेहाचे दफन करायचे होते. लॉकडाऊन असल्याने नातेवाईकांना येता आले नाही परंतु सामाजिक कार्यकर्ते जावेद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या समाजाच्या पद्धतीने, सर्व नियम पाळून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या आणि अशा अनेक घटना या काळात घडल्या.