शेतमाल शेतातच सडतोय ः मजूर मिळेना अन् गिऱ्हाईकही फिरकेना
सासवड (प्रतिनिधी) -पुरंदर तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे जगभर थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणावर ती शेतीमालाची मागणी असूनही गिऱ्हाईकच घराबाहेर पडत नसल्याने नाशवंत शेतीमाल उत्पादक करणाऱ्या बळीराजा पुरता लॉकडाऊन (हवालदिल) झालेला आहे.
एकीकडे करोना व्हायरसचे संकट तर दुसरीकडे अवकाळी येणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात कोडीत, गराडे, चांबळी यासह सासवड, हिवरे या गावात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने हातातोंडाशी आलेले गहू आणि ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ढगाळ हवामानामुळे फळबाग आणि भाजीपाला पिकांवर किडींचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामुळे देखील नुकसान होत आहे.
आजच्या परिस्थिती पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेला भाजीपाल्याचे हातातोंडाशी आलेले पीक चांगल्या पद्धतीने उत्पादन झालेले असून देखील लॉक डाउन मुळे कवडीमोल भावाने व्यापारी विकत घेत आहे. ग्राहकच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मिळेल त्या भावाला शेतीमालाची विक्री करावी लागत आहे. त्यातच अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानात पिक अक्षरशः शेतातच सडून जाण्याची भिती देखील नाकारता येत नाही.
शासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही, अशी तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. राज्य शासनाने केवळ घोषणाबाजी चालवली असून अद्यापही शेतकरी वर्गाच्या नुकसानभरपाई बाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत.