विशेष : यमाजी मालकर
करोना व्हायरसने मानवजातीला दिलेले आव्हान मानव परतवून लावेल की तो मानवजातीला गलितगात्र करून सोडेल, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. पण ज्याचे अस्तित्व कोठे आहे, हेही सहजी ओळखू न येणारा एक व्हायरस मानवजातीकडून अनेक प्राथमिक धड्यांची उजळणी करून घेतो आहे, एवढे नक्की!
करोना व्हायरसने जगात थैमान घातले असताना दोन अशा घटना घडल्या, ज्यामुळे जगातील आजच्या बदलाविषयी हे असे व्यक्त होणे भाग पडले आहे. पहिली घटना आहे ती, अमेरिकेतून आलेल्या एका मित्राची. अमेरिकेत या साथीने कशी दहशत पसरवली आहे, लोक कसे एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत, भविष्यकाळाची तरतूद म्हणून कशी प्रचंड खरेदी करत आहेत आणि अनेक जण कशा नैराश्यावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोळ्या घेत आहेत, याचे वर्णन तो करत होता. एवढे सगळे बोलून झाल्यावर त्याने अमेरिकेच्या आणि तेथील नागरिकांच्या अर्थकारणाचा विषय काढला.
आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे आणि चीनकडून होणारा सर्व मालाचा पुरवठा जवळजवळ ठप्प झाल्याने पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार असल्याने आपल्या गुंतवणुकीचे काय होणार, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. अमेरिकेत कोणत्याही मोठ्या घटनेच्या आर्थिक परिणामांचा आधी शोध घेतला जातो. एक माणूस म्हणून हे साहजिकच असले तरी एक समूह म्हणून त्याला सामोरे गेले पाहिजे, हा शहाणपणा एवढ्या प्रगत मानल्या जाणाऱ्या समाजात दिसत नाही, हे त्याला खटकत होते.
अर्थात, ही बाब आज केवळ अमेरिकन समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नव्या व्याख्या करून त्याला गोंजारणाऱ्या आणि भौतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या जगभरातील समूहात हे सर्व सध्या पाहायला मिळते आहे. जे घडते आहे, ते जेवढे धक्कादायक आहे तेवढेच अद्भुत असे आहे. संकटाच्या वेळी आपले कुटुंब आपल्यासोबत असेल की नाही, आपले नातेवाईक आपल्याला आधार देतील की नाही, सरकारी व्यवस्था आपल्यापर्यंत पोचतील का, आपल्या मुलांचे काय होईल, अशा नव्या नव्या चिंतांनी आधुनिक समाजाला आधीच ग्रासले आहे. करोनो व्हायरसने त्यात भर घातली आहे.
या व्हायरसचा पुढील प्रवास कसा होणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. लाखो माणसांचे बळी घेणाऱ्या साथी जगाच्या इतिहासात कमी नाहीत. 1347 ते 51च्या दरम्यान प्लेगने दोन कोटी माणसे मृत्युमुखी पडली होती म्हणजे त्यावेळच्या युरोपची लोकसंख्या निम्म्याने कमी झाली होती! ती भरून येण्यास पुढे तब्बल 200 वर्षे लागली म्हणे! अगदी अलीकडे म्हणजे 2009-10 ला येऊन गेलेल्या स्वाईन फ्ल्यूने जगात दोन लाख बळी घेतले. पण अशा साथी आता तुलनेने खूप कमी झाल्या असून माणसाचे वयोमान चांगलेच वाढले आहे. अशा स्थितीत करोनाने माणसाला पुन्हा आव्हान दिले आहे. माणसाने एवढी प्रगती केली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नवनवी शिखरे गाठली, पण साध्या डोळ्याला न दिसणाऱ्या, त्याच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा माणसाला सहजी सापडत नसताना त्याने सर्व मानवजातीला हवालदिल केले, हे मात्र मान्य करावे लागते. करोना व्हायरस कसा प्रकट झाला, याविषयीच्या सर्व कारस्थान “कथा’ बाजूला ठेवू यात. कारण त्याविषयीचा खरेखोटेपणा कधीच आपल्यापर्यंत पोचणार नाही. माणसे मृत्युमुखी पडत असल्याने त्याचे अस्तित्व आपल्याला स्वीकारावेच लागते, हे आज महत्त्वाचे.
पृथ्वीतलावर निसर्गाने वेगवेगळ्या मार्गाने जीवसृष्टीची वेळोवेळी पुनर्मांडणी केली आहे. करोनाचे संकट यापुढे आणखी गडद झाले तर त्याच्याकडे जगाची पुनर्मांडणी म्हणूनच पाहावे लागेल. माणूस आपले अस्तित्व वाचविण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करेल, पण आपले अनेक आप्त आपल्याला सोडून निघून गेल्याचे त्याला उघड्या डोळ्याने पाहावे लागेल. करोनाला माणसाने आटोक्यात आणले आणि त्यावर काही रामबाण उपाय लवकर शोधून काढला तर अनेक जीव वाचतील. अनेक साथी परतवून लावल्या तसे माणसाने करोनाचे आव्हानही परतवून लावले, असे आपल्याला त्यावेळी म्हणता येईल.
या दोन्हीही शक्यतांमध्ये करोना माणसाकडून काही प्राथमिक धडे गिरवून घेतो आहे, एवढे नक्की.
त्यातील काही असे –
1.माणूस आहेस, माणसाच्या वेगाने जरूर पळ. पण ही कुत्तरओढ थांबव. दाहीदिशा पळून पळून तुझ्या आयुष्यातील सर्व चैतन्यच तू घालवून बसला आहेस.
2.वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कितीही टोकाला गेलास तरी माणसाचे जीवन शंभर टक्के परस्परावलंबी आहे आणि ते परस्परावलंबन माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, हे कधीही विसरू नकोस.
3.साथीच्या संकटातही तू फक्त स्वत:चा विचार करतोस, याचा अर्थ वेगवान भौतिक विकासाशी सुसंगत समूहजीवनाचे नवे धडे अजून तुला शिकायचे आहेत.
4.जीवनात आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असली तरी कुटुंब व्यवस्था तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे कुटुंबासोबत राहणे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असल्याने तिचा कधीच त्याग करू नकोस.
5.माणसाने माणसांमाणसात टाकलेल्या गरीब-श्रीमंत, जात, धर्म, पंथ, भाषा, देशाच्या कृत्रिम सीमा निसर्ग/नियती कधीच ओळखत नाही. त्यामुळे त्या सीमाभिंती तुला अधिक पक्क्या न करता भविष्यात आणखी खुल्या कराव्या लागतील.
6.ही सृष्टी फक्त तुझ्यासाठी फुलते-बहरते, हा गैरसमज मुळातून काढून टाक. तिच्यावर सर्व प्राणीमात्रांचा सारखाच अधिकार असल्याने त्यांचे सहजीवन तुला मान्य करावे लागेल. प्राणीमात्रांचा अन्न म्हणून वापर करण्याची तुझी क्षमता सर्वाधिक असली तरी त्यातील आधाशीपणा आणि विकृती तुला सोडावी लागेल.
7.तुझे जागतिक कुटुंब आता खूप मोठे झाले आहे आणि वेगवान दळणवळणामुळे ते खूप जवळ आले आहे. त्यामुळे जेवढे वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व सार्वजनिक स्वच्छतेला आहे. सार्वजनिक स्वच्छतेकडे तू केलेले दुर्लक्ष, तू करत असलेल्या केवळ वैयक्तिक स्वच्छतेच्या जोरावर तुला संरक्षण देऊ शकणार नाही, हे लक्षात ठेव.
8.मानवी प्रतिष्ठा जपली तरच तू सुसंस्कृत आहेस, नाहीतर मानवी जीवनाची जी अवहेलना आज आजूबाजूला दिसते आहे, त्याला काही मानवजातीची प्रगती म्हणत नाहीत. त्यामुळे “सर्वे सन्तु निरामयाः’ या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करूनच म्हणजे विषमता दूर करूनच मानवजात पुढे जाऊ शकेल.
9.मुलाबाळांवर प्रेम आहे, म्हणतोस तर तुला शाश्वत विकासाची कास धरावीच लागेल, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा सध्या तू करतो आहेस तसा नाश करून चालणार नाही. तुला मिळाले, त्यापेक्षा अधिक चांगले जग तू मुलांच्या हवाली करून जाणार आहेस.
10.वर्तमानात आजूबाजूला सतत सुरू असलेल्या गोंगाटाला अजिबात घाबरू नकोस आणि त्यात तुझ्याकडून अजिबात भर घालू नकोस. अमूल्य अशा मानवी जन्माने माणसाचा स्वधर्म म्हणून तुझ्या वाट्याला जी भूमिका आली आहे, तिचा शांतपणे, सजगपणे स्वीकार कर.
11.तुझ्या अस्तित्वाचे सर्व नियंत्रण नियतीने तुझ्या हातात दिले आहे, असे समजू नकोस. ते तसे नाही, हे अनेकदा सिद्धच झाले आहे. अमर्याद अवकाश आणि काळाच्या पटलावर मानवी जन्माच्या क्षणभंगुरतेचे भान कायम असू दे. ते भान आले की तुझा मानव सर्वश्रेष्ठ असल्याचा आणि त्याच्या “यशकथां’चा अहंकार आपोआप गळून पडेल आणि क्षणभंगूर मानवी जीवन सुंदर का करायचे, हे स्वत:ला वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही.
अरे हो, दुसरी घटना सांगायचीच राहिली. अमेरिकेचा मित्र भेटला, त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी भारतातल्या कुटुंब व्यवस्थेतील 90 वर्षांची आजी भेटली. करोनाचा विषय काढला, तेव्हा ती म्हणाली, घाबरू नका. एकमेकांची काळजी घ्या. हो, करोनाची साथ आली, असे मी ऐकले आहे. त्याचे काम झाले की करोना आला तसा जाईलच..!