नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कर्मचाऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला असून हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट संकटात देशभरातील सुमारे 80 लाख कर्मचाऱ्यांनी भविष्यनिर्वाह निधीतून तब्बल 30 हजार कोटी रुपये काढले आहेत.
हा निधी एप्रिल ते जुलै या फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत काढण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यांपर्यंत 80 लाख भारतीयांनी त्यांच्या पीएफ अकाऊंटमधून 30 हजार कोटी रुपये काढले आहेत.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 9 ते 29 जून या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये 20 लाख कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढले आहेत. यावरून सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही देशातील कामगार वर्गाला किती मोठा आर्थिक फटका बसला आहे याचा अंदाज बांधता येतो.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना पगार कपातीचाही सामना करावा लागला. तसेच काहींना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. त्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे 30 हजार कोटी हे पीएफ खात्यातून काढण्यावर लोकांनी भर दिला आहे.
तंत्रज्ञानामुळे पीएफ खातेधारकांना तातडीने पैसे देणे सहज शक्य झाल्याचे रिटायर्डमेंट फंडचे मॅनेजर्स सांगतात. तंत्रज्ञानामुळे अधिक वेगवान पद्धतीने निधी खातेदारांना मिळाला. जून महिन्यामध्ये इपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पगाराच्या आधारावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एप्रिलपासून ज्या पीएफ खातेधारकांनी निधी काढला आहे, त्यांच्यापैकी बहुतांश हे 15 हजार किंवा त्याहून कमी मासिक पगार असणारे आहेत.