रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर -खेड तालुक्यात चाकण, राजगुरूनगर आणि आळंदी व त्यापरिसरातील गावे करोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. मागील 10 दिवसांत चाकण (532), आळंदी (165), राजगुरूनगर (354) तिन्ही नगरपरिषदा मिळून 1051 तर तर ग्रामीण भागात 1976 असे एकूण 3027 जण बाधित झाल्या आहेत तर 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तालुक्यातील खराबवाडी, मेदनकरवाडी, चाकण, निघोजे, म्हाळुंगे, कुरुळी, चिंबळी, मरकळ, शेल पिंपळगाव, वडगाव घेनंद, निघोजे, रासे, भोसे, काळूस, मरकळ कडूस, दावडी, मोई रोहकल आदी गावांमध्ये करोनाचा उद्रेक झाला आहे.
खेड तालुक्यात दि. 1 एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. दि. 15 एप्रिलपासून ते अजून कडक करण्यात आले; मात्र नागरिकांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सवलत दिल्याने करोना विषाणूचा समूह संसर्ग सुरूच आहे. यात व्यापारीवर्गाची संख्या जास्त आहे. व्यापारीवर्गाची कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाली आहेत तर त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.
दरम्यान, कोविड सेंटर, दवाखान्यांमध्ये कोविड रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, असे असतानाही तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना या सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नाही
खेड तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय आणि 42 खासगी हॉस्पिटलमध्ये 1 हजार 239 बेडची व्यवस्था आहे. पैकी 521 ऑक्सिजन बेड आहेत. 43 ठिकाणी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खासगी रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसल्याने नवीन रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. महाळुंगे इंगळे कोविड सेंटरमध्ये 752 बेड असून 552 बेड सध्या उपलब्ध आहेत. चांडोली कोविड केअर सेंटरमध्ये 125 बेड असून 11 बेड सध्या उपलब्ध आहेत.
भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न आहेत; मात्र, नागरिक ऐकत नसल्याने करोनाची साखळी तुटत नाही. उलट मजबूत होत चालली आहे. तालुक्यात सोशल मीडियावर साखळी रोखण्याच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाहीत. राजगुरूनगर आळंदी चाकण शहरात भाजीपाला खरेदीसाठी चार तासांत मोठी गर्दी होते याच काळात करोनाचा मोठा संसर्ग होत आहेत. कुटुंबाची कुटुंबे बाधित होत असताना नागरिक काळजी घेत नाहीत.
…तरीही लोक जागे होत नाहीत
संसर्ग झालेल्या व्यक्तीसह त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती खुलेआम फिरत असल्याने तालुका करोनाच्या खाईत लोटला आहे. दररोजची धक्कादायक आकडेवारी आणि स्टेटसला ओळखीच्या माणसांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे फोटो पाहूनही नागरिकांमध्ये अजूनही बदल होत नाही. करोनाबाबत जागरूक भूमिका घेत नसल्याने करोनाचे संकट तालुक्यात अधिकच दाट होत चालले आहे.