श्रीगोंदा -करोना विषाणूचा संसर्ग ही जागतिक आपत्ती आहे. या महामारीमुळे अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. भारतातही करोना विरुद्धचा लढा मोठ्या धैर्याने लढला आहे. तालुका प्रशासनाने आहोरात्र मेहनत घेवून तालुक्यात करोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आणखी संयम व धैर्य ठेवण्याची गरज आहे.कुटुंबासह समाजाच्या सुरक्षिततेसाठी तालुक्यातील जनतेने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
नागवडे म्हणाले, जगाच्या तुलनेत देशात करोना प्रसाराचा वेग कमी आहे. केंद्र व राज्य सरकारने वेळीच पावले उचलून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. तसेच टाळेबंदी जाहीर केल्याने भारताला काही अंशी करोनाला रोखण्यात यश येत असले, तरी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही विशेष चिंतेची बाब आहे. त्यात महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. करोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आपण घेतलेली खबरदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. अपवाद वगळता ग्रामीण भागात अद्याप करोनाचा फैलाव नाही. मात्र प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास स्वतःसह कुटुंबाची व समाजाची सुरक्षितता धोक्यात येऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकोतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
तालुक्यात करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नागवडे कारखान्याने सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी दहा हजार रुपयांची, तर श्रीगोंदा नगरपरिषदेला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली. श्रीगोंदा तालुका आतापर्यंत करोनापासून सुरक्षित राहिला, यात येथील नागरिकांचे सहकार्य आहेच.
पण सर्वाधिक श्रेय आहे येथील स्थानिक प्रशासनाला. तहसिलदार महेंद्र माळी, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आहोरात्र कष्ट घेत तालुक्याचा करोनापासून केलेला बचाव कौतुकास्पदच आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्यकरुन करोनाचे संकट परतवून लावण्याचे आपले ध्येय्य आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी थोड्या कालावधीसाठी संयम राखावा, असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.