नवी दिल्ली – गेल्या वर्षी उत्सवाच्या काळामध्ये ग्राहकांनी खरेदी केली नव्हती. मात्र यावर्षी वातावरण सकारात्मक आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच रिटेलरही कमालीचे आशावादी झाले आहेत असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे.
या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, यासंदर्भात आमच्या संघटनेने ग्राहकांशी विचारणा करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ग्राहकांनी या उत्सवात कपडे खरेदी करण्यास सर्वाधिक पसंती दिली आह. त्यानंतर गृह उपयोगी वस्तू खरेदी करण्याची इच्छा ग्राहकांनी व्यक्त केली.
63 टक्के ग्राहकांनी सांगितले की त्यांना कपडे खरेदी करायचे आहेत. 50 टक्के ग्राहकांनी त्यांना ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करायच्या आहेत असे सांगितले. तर 36 टक्के ग्राहकांनी त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
यावर्षी 27 टक्के ग्राहकांनी दागिने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या वर्षी हे प्रमाण केवळ नऊ टक्के इतके होते. 43 टक्के ग्राहकांनी ते 15 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करणार असल्याचे सांगितले. तर नऊ टक्के ग्राहकांनी ते एक लाखापेक्षा जास्त खर्च करणार असल्याचे सांगितले.
स्वतःबरोबरच इतरांसाठी खरेदी करण्याची इच्छा 50 टक्के ग्राहकांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता रिटेलर्स आशावादी झाले असून आता या क्षेत्रातील उलाढाल वाढून हे क्षेत्र पूर्वपदावर येईल असे रिटेलर्सना वाटते. 21 टक्के ग्राहकांनी हप्त्याच्या माध्यमातून मोठ्या वस्तु खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. रोख रक्कमेऐवजी डिजिटल व्यवहारांना ग्राहकांनी पसंती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.