नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हीस्टा कार्यक्रमा अंतर्गत नवीन संसद भवन बांधले जाणार असून त्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम आजपासून सुरू झाले आहे. महिनाभरापुर्वी पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचे भूमीपुजन झाले होते. भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन पुढील वर्षी साजरा होणार असून त्या वेळी ही नवीन संसदेची इमारत तयार होईल अशी अपेक्षा आहे.
नवीन संसद भवन उभारणीच्या कामातील सर्व अडथळे आता दूर झाले असून चौदा सदस्यांच्या हेरिटेज पॅनेलनेही या कामाला अनुमती दिली आहे. टाटा कंपनीला ही नवीन संसद बांधण्याचे कंत्राट मिळाले असून हे काम 971 कोटी रूपयांचे आहे.
या कामाला 35 दिवस उशिर झाला असला तरी उर्वरीत वेळेत आणि निर्धारीत कालावधीत हे काम पुर्ण केले जाईल असा विश्वास टाटा प्रॉजेक्ट लि या कंपनीने व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष कामाला 35 दिवस विलंब झाला असला तरी या अवधीत आम्ही सारी पुर्वतयारी व्यवस्थीत स्वरूपात केली आहे अशी माहिती या कंपनीचे उपाध्यक्ष संदीप नवलाखे यांनी दिली.