प्रा. नितीन मटकरी
मानव हा संवेदनशील व विचारशील प्राणी आहे. आपल्या भावभावना जपताच तो जगत असतो या सर्वांचा आधार असतो तो मानवी मन. मनात येणारे विचार इतरांना कळावे यासाठी ते व्यक्त होणे गरजेचे आहे. म्हणून भावना, विचार व्यक्त होणे हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा घटक अथवा भाग आहे कोणी लेखनातून, अभिनयातून, नृत्यातून, संभाषणातून, अभिवाचनातून या आणि इतर अनेक माध्यमांतून स्वतःला व्यक्त करीत असतो आणि या सर्वांतून साधला जातो तो संवाद म्हणून संवाद साधणे हे गरजेचे आहे. जाणकार आणि तज्ज्ञांच्या मते संवाद ही कला आहे व ती भाषेच्या माध्यमातून साकारली जाते.
आयुष्याच्या वाटचालीत विद्यार्थी दशेत त्यातल्या त्यात उच्च, व्यावसायिक अथवा तंत्र शिक्षण घेण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर याची गरज असते व याच टप्प्यापासून पुढे आयुष्याच्या वाटचालीत गरज वाटते ती व्यक्त होण्याची, कुणाशीतरी संवाद साधण्याची. पण ज्या विद्यार्थी दशेचा विचार आपण करतो त्याच वेळी विद्यार्थी संवाद साधण्यासाठी कमी पडतात.
ही फार मोठी समस्या शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात त्या-त्या पातळीवर कमी अधिक प्रमाणात आढळून येते व आजही ती कायम आहे. प्रेझेंटेशन मग ते सेमिनार, प्रोजेक्ट इत्यादी विषयांवर असेल त्याचप्रमाणे कॅम्पस मुलाखती असतील यामध्ये अपेक्षित संवाद कौशल्यांचा अभावच असतो.
संवाद म्हणजे कम्युनिकेशन ही एक कला आहे तर मराठी अथवा इंग्रजी ही एक भाषा आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून साधते ती संवाद कला. ही कला विकसित करण्याची सुरुवात होते ती बोलणे या क्रियेपासून. याच बोलण्याबाबत फार मोठा न्यूनगंड आढळून येतो. आपली भाषा, आपल्या बोलण्यावर इतरांच्या काय प्रतिक्रिया असतील, कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल असे अनेक विचार मनात येतात
व त्यांच्या ओझ्याखाली बोलणे ही क्रियाच दबली जाते म्हणून बोलणे मग ते कुठल्याही भाषेतील असो पण त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. म्हणजे आपण बोलू शकतो हा आत्मविश्वास आपला न्यूनगंड दूर करण्यासाठी गरजेचा आहे. भाषा आणि भाषिक कौशल्ये हा या पुढचा टप्पा आहे. आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपल्या कुटुंबीयांसोबत, मित्रमंडळींसोबत बोलणे सुरू करूया. त्यातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासाने मग भाषेकडे वळूया.