सातारा – प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णसेवा सलाईनवर आली असताना केवळ कर्तव्यपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत वैद्यकीय अधिकारी डॉ. सचेतन घोडके यांनी स्वतःला सलाईन लावलेल्या अवस्थेत रूग्ण तपासणी केली. त्यांनी त्या अवस्थेत केलेली रुग्णसेवा ईश्वर सेवेपेक्षा कमी नाहीच तर डॉक्टरांच्या रूपात ईश्वर दिसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या थंडीच्या अनुषंगाने पुसेसावळी पंचक्रोशीत विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय उदासीनता असो किंवा आरोग्य यंत्रणेच्या गलथानपणामुळे डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य सेवकांचे संख्याबळ पुरेसे नसल्याने उपलब्ध डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. त्यातच शनिवारी अर्धा दिवस व रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी झाली होती.
त्यातच येथील आरोग्य अधिकारी डॉ. सचेतन घोडके रविवारपासून आजारी आहेत. भरीसभर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येणार होता. पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांची हेळसांड होणार हे लक्षात घेऊन डॉ. घोडके यांनी आधी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतःवर उपचार करून घेतले आणि नंतर स्वतःला सलाईन लावलेल्या अवस्थेत रुग्ण सेवा केली. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा….’ असे बोलण्यापुरते मर्यादित न राहता आपण कर्ते सुधारक असल्याचा प्रत्यय डॉ. घोडके यांनी कृतीद्वारे दिला आहे.
विविध कारणांमुळे रुग्णांना मूलभूत आरोग्य सेवा-सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याच्या बातम्या रोजच्याच झाल्या आहेत. मात्र अपुरे कर्मचाऱ्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णसेवा ‘सलाईन’वर आलेली असताना केवळ कर्तव्यपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा कणखर डॉ. घोडके यांच्या माध्यमातून पाहण्यास मिळाला. कामाप्रती अत्यंत निष्ठा बाळगून समाजहित जोपासणारे डॉ. घोडके यांच्यासारखे आरोग्य सेवक लाभल्यास आरोग्य विभागाच्या नावलौकिकात निश्चितच भर पडेल.
रुग्ण सेवा करणे हे माझे कर्तव्य असून ते मी पार पाडले आहे. आजारी अवस्थेत रुग्णांनी माझी आस्थेने विचारपूस केली हीच माझ्या कामाची पोच पावती आहे असे मी मानतो.
डॉ. सचेतन घोडके
समाजाप्रती अत्यंतिक संवेदना बाळगून शेवटच्या स्तरातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी डॉ. घोडके यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. तसेच आरोग्य विभागाबद्दलची प्रतिमा बदलण्यासाठी हे आश्वासक पाऊल आहे.
अतुल अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते