योजनेस राज्यभरातून प्रतिसाद : शेतमालास रास्त भाव मिळवून देण्याचा उद्देश
पुणे – केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित सुरू केलेल्या ई-नाम योजनेला राज्यातील बाजार समित्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्याने 65 बाजार समित्यांचा या प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारीत ई-नाम ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतमालास रास्त बाजार भाव मिळवून देणे हा आहे. सद्यःस्थितीत देशातील 585 बाजार समित्या ई-नामला जोडल्या आहेत.
राज्यातील 60 बाजार समित्या दोन टप्यामध्ये ई-नामला जोडल्या आहेत. पहिल्या टप्यातील 30 बाजार समित्यांचे कामकाज सप्टेंबर 2017 पासून सुरू आहे. दुसऱ्या टप्यातील 30 बाजार समित्यांचे कामकाज जानेवारी 2018 पासून सुरू आहे. या व्यतिरिक्त आता आणखी 65 बाजार समित्या या ई-नाम प्रणाली मार्फत जोडण्यात येणार असल्याचे कृषी पणन महामंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध
राज्यात ई-नामची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून सद्यःस्थितीत 67 लाख क्विंटल इतक्या शेतमालाची ई-लिलावाद्वारे विक्री झाली आहे. त्याची किंमत 2085 रुपये कोटी इतकी आहे. ई-नामच्या 60 बाजार समित्यांमध्ये शेतमालाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा (असेईंग लॅब) कार्यान्वित करण्यात आल्या आहे. ई-नाम अंतर्गत ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध असून याद्वारे शेतकऱ्याच्या व इतर संबंधितांच्या खात्यात ऑनलाइन पैसे जमा केले जातात. सद्यःस्थितीत रु. 51 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन जमा करण्यात आली आहे. 60 बाजार समित्यांमधील 11.84 लाख इतक्या शेतकऱ्यांची, 16 हजार 434 व्यापाऱ्यांची व 13 हजार 415 आडत्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.