कोलकाता – नुकत्याच झालेल्या छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव हा “अनपेक्षित” आणि “चिंतेचा विषय” असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत, चिदंबरम यांनी सांगितले की, भाजप प्रत्येक निवडणूक “जशी ही शेवटची लढाई आहे” असे लढते आणि ही बाब विरोधी पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
तथापि या पराभवातून आलेला कमकुवतपणा दूर सारून कॉंग्रेस पक्ष हिरीरीने लोकसभेसाठी काम करेल आणि यश मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. आता सारे लक्ष आगामी लोकसभा निवडणूकीवर केंद्रीत केले जात असून या निवडणूका जिंकणे हे कॉंग्रेस व इंडिया आघाडीचे सर्वात तातडीचे प्राधान्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड या राज्यांत कॉंग्रेसचा पराभव झाला असला तरी तरी या राज्यात कॉंग्रेसच्या मतांचा चाळीस टक्के हा वाटा कायम आहे ही बाबही महत्वाची आहे. चिदंबरम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या मतांची टक्केवारी 45 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल, असा मला विश्वास आहे.
भाजपने आता रेवडी संस्कृतीचा तिरस्कार सोडला असल्याचे दिसते, परंतु मला ध्रुवीकरण, छुपा मुस्लिम आणि ख्रिश्चन विरोधी प्रचार आणि अति-राष्ट्रवादाचा प्रचार या भाजपच्या धोरणांची जास्त काळजी वाटते. उत्तर आणि मध्य भारतातील राज्ये या प्रकारच्या प्रचाराबाबत संवेदनशील असतात. काँग्रेसने त्याला योग्य प्रतिसाद शोधला पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
२०२४ च्या निवडणुकीसाठी जातीची जनगणना हा पक्षाचा सर्वोच्च अजेंडा असल्याचे नमूद करून चिदंबरम म्हणाले, “हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु तो निर्णायक घटक असू शकत नाही. माझ्या मते, बेरोजगारी आणि महागाई या यादीत अग्रस्थानी असले पाहिजेत. प्रत्येक सर्वेक्षणात हे दोन मुद्दे आहेत त्या विषयी लोकांना जास्त काळजी असते, असे चिदंबरम म्हणाले.