नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी अजुनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्यात या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळत आहे. तर विरोधक देखील शेतकऱ्यांच्या बाजुने बोलत आहेत. यावरून केंद्र सरकार कोंडीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते राज्यसभेत कृषी कायद्यांवर ते सरकारची बाजू मांडत होते.
भारतात शेतकरी पाण्याचा वापर करुन शेती करतात. मात्र, काँग्रेस असा पक्ष आहे ज्याला फक्त रक्ताद्वारे शेती करायची आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र सिंह तोमर यांनी केली.विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत. त्यांना कायद्यांमध्ये काय कळलं आहे, हे सांगावे. नवीन कृषी कायद्यांद्वारे शेतकरी त्यांचा शेतमाल देशातील कोणत्याही शहरात विकू शकतात. जर बाजारसमितीच्या बाहेर व्यापार झाला तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही, असं तोमर म्हणाले.
दरम्यान कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना भडकविण्यात येत आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन केवळ एका राज्यापुरते मर्यादित आहे. विरोधक या कादद्यांना काळा कायदा म्हणत आहेत. मात्र एकालाही यात काय काळं दिसतं हे सांगता आलेलं नाही. जेणेकरून त्यात सुधारणा करता येईल, असंही तोमर यांनी नमूद केले.