नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीत कॉग्रेसने महाराष्ट्रात किमान 25 जागा लढविल्या पाहिजे असे मत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांपुढे व्यक्त केले. भाजप आणि कॉग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसह देशभरातील तमाम राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून भाजपविरोधात एकच संयुक्त उमेदवार उतरविला जाणार आहे. अशात, कॉग्रेसने इंडिया आघातील घटक पक्षांशी चर्चा करण्यापूर्वी राज्यातील कॉग्रेसच्या नेत्यांची भूमिका जाणून घेण्यास सुरवात केली आहे.
महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील समितीपुढे आपली भूमिका मांडली. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मोहन प्रकाश आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, कॉग्रेसने महाराष्ट्रातील 25 जागा लढवायला हव्यात अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी बैठकीत मांडली असल्या च बोललं जात आहे. काँग्रेसने कोणकोणत्या जागा लढवायच्या, पक्ष कोठे मजबूत स्थितीत आहे. घटक पक्षांना किती जागा सोडायच्या, कोणत्या सोडायच्या या विषयावरही राज्यांतील नेत्यांनी आपले मत समितीपुढे मांडले असल्याचे समजते.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुध्दा तिन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त जागा आपलाच पक्ष लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सुध्दा 15 जागा लढविण्याची तयारी करीत असल्याचे समजते.यानंतर अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील समिती राज्यांतील नेत्यांच्या भूमिकेबाबतचा अहवाल अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सोपविणार आहे. या रिपोर्टनंतर कॉग्रेस पक्ष इंडिया आघाडतील घटक पक्षांसोबत जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू करणार आहे.
नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि आपली भूमिका समितीपुढे मांडली आहे. मात्र, अद्याप कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. अंतिम निर्णय हायकमांडकडून घेतला जाणार आहे. शिवसेना नेते संजय राउत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर बोलणे पटोले यांनी टाळले. भाजपवर हल्ला चढविताना पटोले म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी पक्षाला लोकशाही मान्य नाही आहे. म्हणूनच ते निवडणुका घेत नाही आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि हे भाजपचे पाप आहे. भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे, असेही ते म्हणाले.