नवी दिल्ली – बहुचर्चित कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकीय नाट्यावर आज पूर्णपणे पडदा पडला आहे. अध्यक्षपदासाठी तीन जणांनी फॉर्म भरले असले तरी मुख्य लढत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यातच होणार आहे. के. एन. त्रिपाठी यांनी सुध्दा निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
खर्गे सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहेत. जी-23 गटाच्या सर्व नेत्यांचे त्यांना पूर्ण समर्थन असल्याचे आज दिसून आले.
केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, खर्गे यांनी 14, थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक अर्ज दाखल केला आहे.
उद्या शनिवारी अर्जांची तपासणी केली जाईल आणि सायंकाळी वैध अर्जाची घोषणा केली जाईल. तीन उमेदवारांमध्ये कुणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. सर्व स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. आपल्याला अध्यक्षाचा पाठिंबा आहे, असा कुणी दावा करीत असेल तर ते चुकीचे आहे, असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
80 वर्षांचे खर्गे हे गांधी कुटुंबाचे विश्वस्त म्हणून ओळखले जातात. सध्या ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, ए. के. एँटनी, पवन कुमार बंसल, सलमान खुर्शीद, अविनाश पांडे, राजीव शुक्ला और मुकुल वासनिक यांनी खर्गे यांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जी-23 गटाचे आनंद शर्मा आणि मनिष तिवारी यांचाही त्यांच्यात समावेश आहे. तर, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम हे थरूर यांचे प्रस्तावक आहेत.