मुंबई – आगामी निवडणुका भाजपसोबत युतीत लढल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती नको, स्थानिक पातळीवर मैत्रिपूर्ण लढत व्हावी, असे वक्तव्य शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
सत्तार म्हणाले, सिल्लोडमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, भाजपचे फक्त 2 आहेत, मग भाजपला जास्त जागा कशा द्यायच्या? अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. एकत्र लढलो तर भाजप आणि शिंदे गटात संघर्ष होईल, म्हणून मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी भावना आहे. तसेच सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होऊ द्या, सगळ्या निवडणुकीनंतर सत्तेत शिंदे गट आणि भाजपच राहील, असे सत्तार म्हणाले.
दरम्यान, जुन महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. महाविकासआघाडी सरकार कोसळले. भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता त्यांच्याच गटातील मंत्री भाजपसोबत युती नको म्हणत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.