नवी दिल्ली – राजस्थानातील (Rajsthan Election) भरतपूर जिल्ह्यातील राजपरिवारातील सदस्य आणि अशोक गेहलोत (Gehlot Sarkar) यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहीलेले विश्वेंद्र सिंह यांचे पुत्र अनिरूध्द सिंह यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खळबळजनक दावा केला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा सुपडा साफ होईल असे भाकित त्यांनी व्यक्त केले आहे. (Congress Vs Bjp)
अनिरूध्द सिंह (Aniruddh Singh) म्हणाले की कॉंग्रेस पक्षाचे पराभवाचे कारण म्हणजे त्यांनी पाच वर्षांत कोणते विकासकार्य केले नाही. राज्याचे जे कोणी नवीन मुख्यमंत्री होतील त्यांना सुरूवातीचे काही दिवस डोके धरूनच बसावे लागेल त्याचे कारण गेहलोत यांनी राज्य अत्यंत क्षीण करून टाकले आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांसमोर अगदी आव्हानात्मक स्थिती राहणार आहे.
आपल्याच पक्षाचे भरतपूर येथील आमदार सुभाष गर्ग यांच्यावरही अनिरूध्द यांनी टीका केली. गर्ग यांनी गेली पाच वर्षे केवळ त्यांची खुर्चि वाचवण्याचेच काम केले. भ्रष्टाचार केला, पेपर लीक घोटाळा केला, आपला खिसा तेवढा भरला. पायाभूत असे कोणतेही काम त्यांनी केले नाही. गोळीबाराच्या घटना घडत आहेत आणि प्रशासन नावाची व्यवस्थाच येथे राहीलेली नाही, असे ते म्हणाले.
मख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला व म्हणाले, गेहलोत प्रत्येक वेळी हेच करतात. काम दुसरा कोणी करतो आणि मुख्यमंत्री ते बनतात. १९९८ मध्ये परसराम मीणा मुख्यमंत्री व्हायचे होते, मात्र तेंव्हा गेहलोतच मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी नेमके काय केले कोणालाच माहिती नाही. २००८ मध्येही सी. पी. जोशी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना केवळ एका मताने ते निवडणूक हरले. २०१८ मध्ये सचिन पायलट प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी पक्षासाठी प्रचंड कष्ट घेतले.त्या सगळ्यावर पाणी फेरून गेहलोतच पुन्हा मुख्यमंत्री झाले.अनिरूध्द पुढे म्हणाले की सचिन पायलट मख्यमंत्री असते तर कॉंग्रेसची अशी अवस्था झाली नसती. मात्र विनाश काले विपरित बुध्दी. यंदा राज्यात भाजपची लाट आहे असा दावाही त्यांनी केला.