नवी दिल्ली – कॉंग्रेसमधील असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या 23 ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षनेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी साधलेल्या संवादातून तसे सूचित होत आहे.
मागील काही काळापासून कॉंग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा गट पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत आहे.
अशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसच्या पदरी पुन्हा पीछेहाट पडली. त्या निवडणुकांच्या निकालांनंतर असंतुष्ट नेत्यांच्या गटाने बैठकांचे सत्र सुरू केले. त्यामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली. त्या गटाने पक्षाला सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व मिळण्याचा आग्रह धरला आहे.
असंतुष्ट नेत्यांचा गट पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्या गटापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेतृत्वाने सुरू केल्याचे दिसते. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी त्या गटाचे सदस्य असणाऱ्या भुपिंदरसिंह हुडा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी सोनिया आणि आझाद यांच्यात चर्चा झाली. पक्षाच्या इतर काही नेत्यांवरही असंतुष्ट गटाच्या सदस्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, सोनियांशी चर्चा केल्यानंतर आझाद यांनी नेतृत्वाविषयी कुठला प्रश्न नसल्याचे पत्रकारांशी बोलताना म्हटले. आमच्यातील चर्चेची घडामोड तुमच्या दृष्टीने बातमीचा विषय असेल. पण, ती चर्चा नियमित स्वरूपाची होती. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष एकजुटीने कसा सज्ज होईल याविषयी आमची चर्चा झाली. कुणीच सोनियांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.